Adawad Gram Panchaya यावल | मिलिंद जंजाळे | अडावद ग्रामपंचायतीत १५ वा वित्त आयोग निधीअंतर्गत राबविण्यात आलेल्या ई-निविदा प्रक्रियेवरून वाद निर्माण झाला असून ग्रामपंचायत सदस्य जुनेद खान मुनसफखान पठाण यांनी सरपंच आणि ग्रामसेवकांवर संगनमताचे गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणामुळे गावात चर्चेला उधाण आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ५ मार्च २०२६ आणि ११ मार्च २०२६ रोजी काढण्यात आलेल्या ई-टेंडर प्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव असल्याचा आरोप करण्यात आला आहे. संबंधित निविदा प्रक्रिया ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात न घेता, कोणताही ठराव न करता आणि मासिक सभेत चर्चा न करता पार पाडल्याचे पठाण यांनी आपल्या तक्रारीत नमूद केले आहे.
पठाण यांनी पुढे असा आरोप केला की, बहुतांश कामे एकाच ठेकेदाराला देण्यात आली असून कामांचा दर्जाही समाधानकारक नाही. विरोध करूनही संबंधित कामांची बिले काढली जात असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
तक्रार केल्यानंतर सरपंच व ग्रामसेवकांकडून धमक्याही दिल्या जात असल्याचा आरोप पठाण यांनी केला आहे. “तुला जे करायचं ते कर, आमचं कोणी काही बिगाडू शकत नाही,” असे सांगितल्याचा उल्लेख त्यांनी केला आहे.
या प्रकरणी मुख्यमंत्री पोर्टलवर तक्रार करूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच विस्तार अधिकारी आर.टी. सैंदाणे यांच्याकडून समाधानकारक प्रतिसाद मिळत नसल्याचेही त्यांनी नमूद केले.
गटविकास अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात संबंधित ई-निविदा प्रक्रिया तात्काळ रद्द करण्याची तसेच आतापर्यंत झालेल्या कामांची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. चौकशी न झाल्यास पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
दरम्यान, या आरोपांमुळे अडावद ग्रामपंचायतीतील कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून प्रशासनाची भूमिका काय असेल, याकडे स्थानिकांचे लक्ष लागले आहे. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होऊन वस्तुस्थिती समोर येणार का, याबाबत गावकऱ्यांमध्ये उत्सुकता आहे.








