Government Scheme रावेर-यावल | मिलिंद जंजाळे | मतदारसंघात सन २०२६-२७ साठी ‘गाळमुक्त धरण – गाळयुक्त शिवार’ योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी आमदार अमोलभाऊ जावळे यांच्या पुढाकारातून महत्त्वपूर्ण हालचाली सुरू झाल्या आहेत. याच अनुषंगाने उपविभागीय अधिकारी, फैजपूर यांच्या कार्यालयात त्यांच्या प्रमुख उपस्थितीत आढावा बैठक पार पडली.
या बैठकीत मतदारसंघातील मध्यम व लघु प्रकल्प, पाझर तलाव, सिमेंट नाला बंधारे तसेच उथळ नाल्यांमध्ये साचलेल्या गाळाच्या उपशाच्या कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. जलस्त्रोतांमध्ये साचलेला गाळ शेतकऱ्यांनी स्वखर्चाने विनामूल्य आपल्या शेतात नेऊन शेतीसाठी वापरावा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले.
तसेच, जलस्त्रोतांमधून गाळ वाहून नेण्यास इच्छुक असलेल्या शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकारी, फैजपूर तसेच संबंधित विभागाकडे मागणी अर्ज सादर करावा. अर्ज प्राप्त होताच तात्काळ परवानगी देण्यात येईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. या निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
यावल तालुक्यातील शेतकऱ्यांनी नायब तहसीलदार अतुल गांगुर्डे (मो. ९८८१२९००४) यांच्याशी, तर रावेर तालुक्यातील शेतकऱ्यांनी नायब तहसीलदार संजय तायडे (मो. ९८२३९७७५९३) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.
या बैठकीस उपविभागीय अधिकारी, तहसीलदार (यावल व रावेर), तालुका कृषी अधिकारी, गटविकास अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता (सावदा), मोर धरण उपविभाग हिंगोणा येथील उपअभियंता, जिल्हा परिषद सिंचन उपविभाग रावेरचे अधिकारी, वनविभागाचे आरएफओ तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.








