Raj Thackeray
साक्षीदार | १० ऑक्टोबर २०२३ | राज्यात नेहमीच टोल प्रश्नावर मनसे आक्रमक होत असतांना दिसत असते. गेल्या चार दिवसापासून देखील राज्यातील अनेक भागातील मनसे कार्यकर्ते या प्रश्नावर आक्रमक झाले असतांना राज ठाकरे यांनी देखील वक्तव्य केल्याने आता राज ठाकरेंना राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत अटक करा, अशी मागणी आरपीआय खरात गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात यांनी केली आहे. राज ठाकरे हे वैचारिक गोंधळलेले नेते असल्याची टीका देखील खरात यांनी केली आहे.
टोलनाक्यांवर आकारल्या जाणाऱ्या टोलच्या मुद्द्यावरुन राज ठाकरे आक्रमक झाले आहेत. कार आणि इतर छोट्या वाहनांसाठी टोल आकारला तर टोल नाके जाळून टाकू असा इशारा राज ठाकरे यांनी दिला होता. याच इशाऱ्यावरुन सचिन खरात यांनी राज ठाकरेंना अटक करण्याची मागणी केली आहे. राज ठाकरे यांनी राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत अटक करा, अशी मागणी सचिन खरात यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. राज ठाकरे हे वैचारिक गोंधळलेले नेते असून त्यांची मराठी पाटी आणि टोलनाका ही आंदोलने फेल ठरली असल्याची टीकाही खरात यांनी केली.







