Arun Bhai Gujarati मुंबई/चोपडा | साक्षीदार न्यूज । महाराष्ट्राच्या राजकारणात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय भूकंप होताना दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू आणि जिवलग सहकारी म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ नेते, माजी विधानसभा अध्यक्ष अरुण गुजराती यांनी अखेर ४० वर्षांची साथ सोडत अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.
मंगळवारी (११ नोव्हेंबर २०२५) सायंकाळी मुंबईतील महिला आर्थिक विकास महामंडळाच्या कार्यालयात अरुण गुजराती हे अधिकृतपणे अजित पवार गटात सामील होणार आहेत.
भावनिक प्रतिक्रिया देत सोडली साथ
पक्षप्रवेशापूर्वी, आज सकाळीच अरुण गुजराती यांनी मुंबईतील वाय. बी. चव्हाण सेंटर येथे शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी दिलेली भावनिक प्रतिक्रिया लक्षवेधी ठरली. गुजराती म्हणाले, “शरद पवार साहेबांसोबत आनंदाचा काळ गेला. ज्यांनी मला मोठे केले ते शरद पवार आणि ज्यांनी मला पुढे आणले ते माझे कार्यकर्ते. या दोघांच्यामध्ये मी सँडविच (Sandwich) झालो होतो.“
मात्र, स्थानिक कार्यकर्त्यांचा आग्रह आणि त्यांची राजकीय गरज लक्षात घेऊन अखेर त्यांनी अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कार्यकर्त्यांच्या दबावापुढे झुकले
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात विभाजन झाल्यानंतर, चोपडा मतदारसंघात अरुण गुजराती यांच्या निष्ठावान कार्यकर्त्यांमध्येही मोठी फूट पडली होती. अनेक कार्यकर्त्यांनी अन्य पक्षांकडे मोर्चा वळवण्यास सुरुवात केली होती. “अजित पवारांसोबत गेलात, तर आम्ही तुमच्यासोबत राहू; अन्यथा आम्हाला आमचा मार्ग मोकळा आहे,” असा स्पष्ट पवित्रा कार्यकर्त्यांनी घेतल्याने, गुजराती यांना हा महत्त्वाचा निर्णय घेणे भाग पडले.
४० वर्षांच्या निष्ठेचा अंत
अरुण गुजराती हे गेली ४० वर्षे शरद पवार यांचे निष्ठावंत शिलेदार राहिले आहेत. काँग्रेस पक्षातून राजकारणाची सुरुवात केल्यापासून ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपर्यंत ते पवारांसोबतच होते. या काळात त्यांनी मंत्री, विधानसभेचे अध्यक्ष, प्रदेशाध्यक्ष अशा विविध महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. तसेच, चोपडा मतदारसंघात त्यांनी आमदार म्हणून दोन कार्यकाळ पूर्ण केले आहेत.
गुजराती यांचा पक्षप्रवेश हा अजित पवार गटासाठी चोपडा मतदारसंघात मोठा राजकीय फायदा मिळवून देणारा आणि ‘प्रतिष्ठेचा प्रवेश’ मानला जात आहे. या निर्णयामुळे शरद पवार गटाला जळगाव जिल्ह्यात मोठा धक्का बसला आहे.







