ATMFees साक्षीदार न्युज | रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने एटीएम व्यवहारांवरील इंटरचेंज फीमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा थेट परिणाम ग्राहकांवर होणार असून, १ मे २०२५ पासून एटीएममधून पैसे काढण्यासाठी जास्त शुल्क द्यावे लागणार आहे. नव्या नियमांनुसार, प्रत्येक एटीएम व्यवहारावर आता १९ रुपये शुल्क आकारले जाईल, जे यापूर्वी १७ रुपये होते. तसेच, खात्यातील शिल्लक तपासण्यासाठी लागणारे शुल्क ६ रुपयांवरून ७ रुपयांवर गेले आहे.
ही शुल्कवाढ ग्राहकांच्या बँकेने ठरवलेल्या मोफत व्यवहारांच्या मर्यादेनंतर लागू होईल. मेट्रो शहरांमध्ये ग्राहकांना दरमहा ५ मोफत व्यवहार, तर नॉन-मेट्रो शहरांमध्ये ३ मोफत व्यवहार मिळतील. या मर्यादेपलीकडे गेल्यास प्रत्येक व्यवहारासाठी अतिरिक्त शुल्क भरावे लागेल.
एटीएम इंटरचेंज फी म्हणजे एका बँकेने दुसऱ्या बँकेच्या ग्राहकांना एटीएम सेवा पुरवण्यासाठी आकारले जाणारे शुल्क. हे शुल्क बँका ग्राहकांकडून वसूल करतात. व्हाईट-लेबल एटीएम ऑपरेटर्सनी वाढता खर्च पाहता शुल्कवाढीची मागणी केली होती, ज्याला RBI ने मान्यता दिली.
दुसरीकडे, डिजिटल पेमेंटच्या वाढत्या वापरामुळे रोखीच्या व्यवहारांमध्ये लक्षणीय घट झाली आहे. UPI आणि ऑनलाइन वॉलेट्समुळे ग्राहकांना रोख काढण्याची गरज कमी भासत आहे. सरकारी आकडेवारीनुसार, २०१४ मध्ये ९५२ लाख कोटी रुपयांचे डिजिटल व्यवहार झाले होते, तर २०२३ मध्ये हा आकडा ३,६५८ लाख कोटी रुपयांवर पोहोचला. फेब्रुवारी २०२५ मध्ये UPI द्वारे १,६११ कोटी व्यवहार झाले, ज्यामध्ये २१.९६ लाख कोटी रुपये हस्तांतरित झाले.
या शुल्कवाढीचा सर्वाधिक फटका लहान बँकांच्या ग्राहकांना बसण्याची शक्यता आहे. डिजिटल व्यवहारांचा प्रसार वाढत असल्याने एटीएमचा वापर कमी होत आहे. ग्राहकांनी आता आपल्या बँकिंग सवयींमध्ये बदल करून डिजिटल पेमेंटचा अधिक वापर केल्यास हे अतिरिक्त शुल्क टाळता येईल.
Raver Honey Trap | रावेर हनी ट्रॅप प्रकरणात 100 हून अधिक जण ,अनेकांनी आत्महत्या केल्याचा संशय ?