Bhusawal Cricket Crime भुसावळ | मिलिंद जंजाळे | शहरातील लक्ष्मी नगर परिसरात क्रिकेट खेळताना झालेल्या किरकोळ वादाने अचानक हिंसक रूप धारण करत अल्पवयीन मुलावर गंभीर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत ओम सावळे या मुलाच्या डोक्यावर बॅटने जोरदार प्रहार करण्यात आल्याने तो गंभीर जखमी झाला असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनमध्ये रंजना विकास सावळे (वय 38, रा. मिर्ची ग्राउंड, लक्ष्मी नगर, जुना वांजोळा रोड, भुसावळ) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्या आपल्या पती विकास सावळे व कुटुंबासह वास्तव्यास असून मजुरी करून उदरनिर्वाह करतात.
दिनांक 14 मार्च रोजी सायंकाळी सुमारे 6 वाजता त्यांचा मुलगा ओम सावळे हा ध्रुव बारी व प्रथमेश बारी यांच्यासोबत क्रिकेट खेळत असताना वाद निर्माण झाला. या वादाने काही क्षणांतच गंभीर स्वरूप घेतले.
वाद वाढत असताना घटनास्थळी उपस्थित असलेले गोपाळ बारी यांनी संतापाच्या भरात रंजना सावळे व त्यांच्या मुलासोबत धक्काबुक्की करत शिवीगाळ केली. परिस्थिती हाताबाहेर जात असताना त्यांनी ओम सावळे यांच्या डोक्यावर बॅटने जोरदार वार केला. या हल्ल्यात ओमच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होऊन तो गंभीर जखमी झाला.
घटनेदरम्यान हर्षदाबाई यांनी मध्यस्थी करत भांडण थांबवण्याचा प्रयत्न केला. जखमी मुलाला तातडीने उपचारासाठी नेण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर पोलिस केस असल्याने पुढील वैद्यकीय प्रक्रियेसाठी पोलिसांकडे जाण्याचा सल्ला देण्यात आला.
यानंतर पोलिसांनी मेडिकल मेमो दिल्यानंतर ओम सावळे याला भुसावळ येथील ट्रामा केअर सेंटरमध्ये नेण्यात आले. डॉक्टरांनी डोक्याला गंभीर दुखापत झाल्याचे निदर्शनास आणत पुढील उपचारासाठी जळगाव येथील सिव्हिल रुग्णालयात पाठविले. तेथे सिटी स्कॅन करून जखमेवर टाके घालण्यात आले.
या प्रकरणी रंजना सावळे यांनी दिनांक 15 मार्च 2026 रोजी भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली आहे. आरोपी गोपाळ बारी (रा. लक्ष्मी नगर, भुसावळ) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS 2023) अंतर्गत कलम 115(2), 118(1), 352, 352(1), 351(3) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पोलिसांनी पुढील तपास सुरू केला असून आरोपी एसबीआय लाइफ इन्शुरन्समध्ये कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे. साध्या क्रिकेट वादातून घडलेल्या या हिंसक प्रकारामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून परिसरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कठोर कारवाईची मागणी होत आहे.








