साक्षीदार | १३ ऑक्टोबर २०२३ | राज्यातील चेंबूरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. चेंबूर येथील आणिक गावातील महानगरपालिका शाळेत मिडडे मिलमुळे शाळकरी मुलांना विषबाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शाळेत देण्यात आलेली डाळ आणि खिचडी खाऊन १६ विद्यार्थ्यांना त्रास जाणवू लागल्याने त्यांना शताब्दी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चेंबूरच्या आणिक गावातील महानगरपालिका शाळेत मध्यान्न भोजनातून शाळकरी मुलांना विषबाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जेवणामध्ये मुलांना डाळ आणि खिचडी देण्यात आली होती. ज्यानंतर विद्यार्थ्यांना उलटी, मळमळ सुरू झाली. त्रास जाणवू लागल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.
डॉक्टरांच्या माहितीनुसार, एकूण १८० मुलांना हे मध्यान्न भोजन देण्यात आले होते. यामधील सहावी आणि सातवीतील १६ मुलांना त्रास होऊ लागला. ज्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या या सर्व मुलांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगत एक्सरेही काढण्यात आले असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.