साक्षीदार | ६ नोव्हेबर २०२३ | भुसावळ तालुक्यातील साकेगावजवळील वाघूर नदीच्या पुलावर रविवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास नातीच्या लग्न लावून घरी पतरणाऱ्या दाम्पत्याला मागून भरधाव येणाऱ्या बसने चिरडल्याची घटना घडली आहे. यामध्ये दुचाकीस्वार कुतोबोद्दीन शेख अजीमोद्दीन (वय ६५, रा. असोदा ता. जळगाव) हे जागीच ठार झाले. तर त्यांची पत्नी बदरुननीसा शेख तोबोद्दीन या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर गोदावरी हॉस्पिटल येथे उपचार सुरु आहे.
जळगाव तालुक्यातील असोदा गावातील किल्लू मोहल्ल्यात कुतोबाद्दीन शेख हे कुटुंबियांसह वास्तव्यास होते. हातमजूरी करुन ते कुटुंबाचा उदनिर्वाह करीत होते. रविवारी भुसावळ येथे त्यांच्या नातीचे लग्न असल्याने शेख दाम्पत्य (एमएच १९ ऐएम ०६८७) क्रमांकाच्या दुचाकीने सकाळी गेले होते. लग्न कार्य आटोपून सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास शेख दाम्पत्य दुचाकीने जळगावकडे येण्यासाठी निघाले. साकेगावजवळील वाधूर नदीच्या पुलावर मागून भरधाव वेगाने येणाऱ्या (एमएच २० बीएल २७३९) क्रमांकाच्या बसने शेख यांच्या दुचाकीने मागून जोरदार धडक दिली. यामध्ये दुचाकी ही बसच्या मागील चाकात आल्याने दुचाकीचा चुराडा झाला होता. शेख दाम्पत्य रस्त्यावर कोसळले. यावेळी बसचे टायर हे कुतोबोद्दीन शेख यांच्या अंगावरुन गेल्याने ते चिरडले गेले. यात त्यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांच्या पत्नीला डोक्याला आणि चेहऱ्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांच्यावर गोदावरी हॉस्पिटल येथे उपचार सुरु आहे.