Chalisgaon Insurance Fraud चाळीसगाव | सुनिल भोळे | तालुक्यातील दहिवद फाट्यावर झालेल्या कथित अपघाती मृत्यू प्रकरणात धक्कादायक फसवणूक उघडकीस आली आहे. ५० लाख रुपयांच्या पर्सनल एक्सीडेंट विमा दाव्यासाठी अपघाताचा बनाव रचल्याचा आरोप असून या प्रकरणात मृताच्या कुटुंबीयांसह चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी मंदार करंबळेकर आणि मेहुनबारे पोलीस ठाण्यातील चार पोलीस कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्राप्त माहितीनुसार, दि. ३ मे २०२५ रोजी मालेगाव येथील दुचाकीस्वार राजेंद्र शालिंदर जाधव यांचा दहिवद फाट्यावर चारचाकी वाहनाच्या धडकेत अपघात झाल्याचा दावा करण्यात आला होता. या अपघातात जखमी झालेल्या जाधव यांचा चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती कुटुंबीयांनी विमा कंपनीला दिली होती.
या घटनेच्या आधारे श्रीराम जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडकडे ५० लाख रुपयांच्या विम्याचा दावा श्रीमती अरुणा राजेंद्र जाधव यांनी सादर केला. दाव्यानुसार दि. १९ एप्रिल २०२५ रोजी रात्री सुमारे ९.३० वाजता राजेंद्र जाधव हे त्यांच्या मोटरसायकल (क्र. एमएच ४१ बीक्यू २८१७) वरून मालेगावकडे जात असताना काळ्या रंगाची महिंद्रा थार (क्र. एमएच १९ डीव्ही ०५०५) या वाहनाने धडक दिली होती. या प्रकरणात मेहुनबारे पोलिस ठाण्यात एफआयआर क्र. ८६/२०२५ नोंदविण्यात आला होता.
मात्र विमा कंपनीने अधिक तपासासाठी ब्ल्यू स्पाय या तपास संस्थेकडे चौकशी सोपवली. चौकशीदरम्यान अनेक गंभीर विसंगती समोर आल्या. तपास अधिकाऱ्यांना असे आढळून आले की, राजेंद्र शालिंदर जाधव यांचा प्रत्यक्ष मृत्यू दि. २३ फेब्रुवारी २०२४ रोजी यकृताच्या गंभीर आजारामुळे झाला होता. ते दीर्घकाळ मद्यपान करत असल्याने त्यांच्या आरोग्याशी संबंधित गुंतागुंत निर्माण झाली होती.
तपास अधिकाऱ्यांनी मृताच्या घरी भेट दिली असता भिंतीवर लावलेल्या फोटोवर मृत्यू दिनांक २३/०२/२०२४ असा उल्लेख आढळून आला. म्हणजेच कथित अपघाताच्या तारखेच्या बऱ्याच आधी त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. तसेच ग्रामपंचायतीच्या नोंदी तपासल्यावर मृत्यूची अधिकृत नोंदच नसल्याचे माहिती अधिकारातून दि. १२/०२/२०२६ रोजी स्पष्ट झाले.
तपासात आणखी धक्कादायक बाब समोर आली. मृतकाच्या आधार कार्ड व इतर कागदपत्रांमध्ये वेगवेगळे पत्ते नमूद असल्याचे आढळले. शिवाय श्रीराम इन्शुरन्स व्यतिरिक्त सुमारे १० विमा कंपन्यांकडून विमा पॉलिसी घेतल्याचेही उघड झाले.
यावरून अपघात व मृत्यूची कथा पूर्णपणे बनावट असल्याचा संशय बळावला. या प्रकरणात श्रीमती अरुणा राजेंद्र जाधव, संभाजी शिवाजी पाटील (तक्रारदार), महिंद्रा थार वाहनाचा चालक-मालक, तसेच चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयाचे तत्कालीन वैद्यकीय अधिकारी मंदार करंबळेकर यांनी संगनमताने बनावट कागदपत्रे तयार केल्याचा आरोप आहे.
तसेच मेहुनबारे पोलिस ठाण्यात पो. महेंद्र पाटील, रवींद्र एकनाथ बत्तीशे, सचिन अशोक निकम, सुनील अशोक निकम यांनी खोटी नोंद केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणात BNS 2023 अंतर्गत कलम 318(4), 318(2), 336(2), 338, 336(3), 341(1), 340(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्व आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी पाचोरा बापू रोहम करत आहेत.
इन्शुरन्स फसवणूक रॅकेटचा संशय
या घटनेमुळे चाळीसगाव परिसरात विमा दाव्यांसाठी बनावट कागदपत्रे तयार करणाऱ्या संभाव्य रॅकेटचा पर्दाफाश झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे सरकारी रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी या प्रकरणात सामील असल्याचा आरोप झाल्याने प्रकरण अधिक गंभीर बनले आहे.
ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी मंदार करंबळेकर यांच्या कार्यकाळातील विमा संबंधित कागदपत्रांची चौकशी करावी, अशी मागणीही स्थानिक स्तरावरून होत आहे.








