Jal Jeevan Mission यावल | मिलिंद जंजाळे | यावल तालुक्यातील दहिगाव येथे जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनेच्या कामांबाबत अनियमिततेचे आरोप पुढे येत असून, संबंधित कामांच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त होत असून, संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, संबंधित ठेकेदाराने यापूर्वी केलेल्या काही कामांमध्येही दर्जाबाबत तक्रारी आल्या होत्या. कामे पूर्ण झाल्याचे दाखवले जात असले, तरी अल्पावधीतच त्यामध्ये बिघाड दिसून येत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
दहिगावमधील सध्याच्या जलजीवन योजनेच्या कामांमध्येही निकृष्ट साहित्याचा वापर होत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. विशेषतः पाईपलाईन, जलसाठा आणि इतर बांधकामांच्या गुणवत्तेबाबत शंका उपस्थित केल्या जात असून, यामुळे भविष्यात पाणीपुरवठा व्यवस्थेवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
तालुक्यातील नागरिकांकडून संबंधित ठेकेदाराने केलेल्या सर्व कामांची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी होत आहे. दोषी आढळल्यास कठोर कारवाई करून सार्वजनिक निधीचा अपव्यय टाळावा, अशी भूमिका नागरिकांनी मांडली आहे.
दरम्यान, प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन उच्चस्तरीय चौकशी समिती नेमावी, तसेच सुरू असलेल्या कामांवर देखरेख वाढवावी, अशी मागणी पुढे येत आहे. अन्यथा ग्रामस्थांकडून आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.







