Devendra Fadnavis साक्षीदार न्युज । महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या राजकीय इतिहासातील एक मोठा गौप्यस्फोट करत 2014 मध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष (भाजप) यांच्यातील युती का तुटली, याचा खुलासा केला आहे. सिक्कीमचे राज्यपाल ओमप्रकाश माथुर यांच्या सत्कार समारंभात बोलताना फडणवीस यांनी या घटनेची सविस्तर माहिती दिली. त्यांनी सांगितले की, भाजपने शिवसेनेला 147 जागा देण्याची ऑफर दिली होती आणि शिवसेनेकडून मुख्यमंत्री, तर भाजपकडून उपमुख्यमंत्रीपदाचा फॉर्म्युला ठरला होता. पण उद्धव ठाकरे 151 जागांवर अडून राहिल्याने ही युती संपुष्टात आली.
फडणवीस यांनी पुढे सांगितले की, त्या काळात शिवसेनेच्या नेतृत्वाशी सतत चर्चा सुरू होती. भाजपने उदारपणे 147 जागा शिवसेनेला आणि 127 जागा स्वत:साठी ठेवण्याचा प्रस्ताव मांडला होता. यात शिवसेनेला मुख्यमंत्रीपद आणि भाजपला उपमुख्यमंत्रीपद देण्याची तयारी होती. मात्र, उद्धव ठाकरे यांनी 151 जागांची मागणी सोडली नाही. यावरून ओमप्रकाश माथुर यांनी अमित शहा यांच्याशी संवाद साधला आणि शहा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर हा फॉर्म्युला निश्चित झाला होता की, 147 जागा शिवसेनेला आणि 127 जागा भाजपला मिळतील, अन्यथा युती होणार नाही.
Devendra Fadnavis फडणवीस म्हणाले, “आम्ही शिवसेनेला शेवटचा प्रस्ताव दिला की, 147 जागांवर तुम्ही लढा, आम्ही 127 जागा लढू. दोघांचे मिळून 200 हून अधिक आमदार निवडून येतील आणि तुमचा मुख्यमंत्री, आमचा उपमुख्यमंत्री असेल. पण उद्धव ठाकरे यांनी 151 जागांवर ठाम राहून एकही जागा कमी करण्यास नकार दिला. ते कौरवांसारखे वागले, ज्यांनी पाच गावेही देण्यास नकार दिला होता. पण आमच्यासोबत श्रीकृष्ण होते.” त्यांनी पुढे सांगितले की, या परिस्थितीत भाजपने स्वतंत्रपणे निवडणूक लढवली. फडणवीस प्रचारात व्यस्त असताना ओमप्रकाश माथुर आणि अमित शहा यांनी रणनीती आखली, तर नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेमुळे भाजपने पहिल्यांदाच 260 जागा लढवून सर्वात मोठा पक्ष म्हणून स्थान मिळवले.
फडणवीस Devendra Fadnavis यांनी या यशाचे श्रेय मोदी, शहा आणि माथुर यांना दिले. ते म्हणाले, “गेल्या 30 वर्षांत महाराष्ट्रात 100 पेक्षा जास्त जागा जिंकणारी भाजप ही एकमेव पक्ष ठरली आहे.” या खुलाशाने 2014 च्या युती तुटण्यामागील कारणांना नवीन दृष्टिकोन दिला आहे.








