Dharangaon Mahashivratri धरणगाव | साक्षीदार न्यूज | महाशिवरात्रीनिमित्त धरणगाव शहरात यंदाही भक्तिभाव, उत्साह आणि भव्यतेचा संगम अनुभवायला मिळाला. “भोले सरकार राजराजेश्वर श्री सार्जेश्वर महादेव मंदिर भक्त परिवाराच्या” वतीने सालाबादप्रमाणे यावर्षीही आगळेवेगळे आयोजन करण्यात आले होते. पालखी मिरवणूक, शाही बारात आणि बैलगाड्यांवर साकारलेले १२ ज्योतिर्लिंग दर्शन हे या सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरले.

मागील नऊ वर्षांपासून सातत्याने हा उपक्रम राबवला जात असून, यंदाही महाशिवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त सकाळी ४.३० वाजता महाभस्म आरतीने कार्यक्रमाची सुरुवात झाली. सकाळी १० वाजल्यापासून फराळ वाटप करण्यात आले. सायंकाळी ५ वाजता भव्य पालखी सोहळा व शाही बारात मिरवणूक काढण्यात आली.
या मिरवणुकीत बैलगाड्यांवर १२ ज्योतिर्लिंगांचे दर्शन घडवण्यात आले. यासोबतच महाकाली माता, भोलेनाथ, बाहुबली हनुमान, नंदीवर स्वार महादेव, राधा-कृष्ण, राम-लक्ष्मण, देव-दानव-मानव तसेच ‘भुतों की बारात’ अशा विविध झाँक्यांनी भक्तांचे लक्ष वेधून घेतले.
रामदेवजी बाबा नगर येथे लोकनियुक्त नगराध्यक्ष लिलाबाई सुरेश चौधरी यांच्या हस्ते आरती संपन्न झाल्यानंतर मिरवणुकीला सुरुवात झाली. वाद्यांच्या तालावर थिरकणारे युवा भक्त, विविध देखावे, त्यानंतर बैलगाड्यांवरील १२ ज्योतिर्लिंग दर्शन आणि शेवटी सुंदर सजावट असलेली बाबा भोलेनाथांची पालखी असा भव्य क्रम होता.
मिरवणुकीचा मार्ग रामदेवजी बाबा नगर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, छत्रपती शिवराय स्मारक, परिहार चौक, लांडगे गल्ली, लालबहादूर शास्त्री स्मारक, कोट बाजार, तात्यासाहेब महात्मा फुले स्मारक (धरणी चौक), डेलची, बजरंग चौक, हनुमान नगर, पारोळा नाका असा होत सार्जेश्वर महादेव मंदिरात समारोप झाला.
रात्री सामुदायिक रूद्राष्टकम्, लिंगाष्टकम्, शिवस्तुती, कालभैरव अष्टक, नटराज स्तुती, द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्र यांचे सामूहिक पठण तसेच शिव तांडव नृत्य, सांस्कृतिक नाट्यकथा आणि भजन कार्यक्रम महिला मंडळाच्या वतीने सादर करण्यात आले.
उज्जैन येथून आलेल्या कलाकारांनी विशेष सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. विद्युत रोषणाई, पारंपरिक वाद्यांचा गजर आणि ‘भोलेबाबा’च्या जयघोषाने संपूर्ण धरणगाव शहराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते.
विशेष म्हणजे, गावातील कोणाकडूनही आर्थिक योगदान न घेता एवढा भव्य कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडल्याने “भोले सरकार” भक्त परिवाराच्या नियोजनाचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रत्येक सदस्याने घरचे कार्य समजून जबाबदारी स्वीकारली होती. गावातील तसेच बाहेरील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.







