Maharashtra Political News | साक्षीदार न्यूज | राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना चांगलाच वेग आला आहे. युती, आघाड्या, संभाव्य फाटाफूट आणि सत्तासमीकरणांवरून दररोज नवे दावे-प्रतिदावे समोर येत आहेत.
अशातच एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होतील, असा दावा वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. या दाव्यानंतर भाजप तसेच शिंदे गटातील अनेक नेत्यांकडून प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या.
दरम्यान, आता खुद्द शिंदे गटातील ज्येष्ठ नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय चर्चांना नवा आयाम मिळाला आहे. मुख्यमंत्रिपदाबाबत बोलताना त्यांनी सूचक आणि खळबळजनक विधान केले आहे.
प्रकाश आंबेडकर यांच्या दाव्याविषयी विचारले असता गुलाबराव पाटील म्हणाले “प्रकाश आंबेडकर हे अनुभवी आणि मोठे नेते आहेत. गेल्या अडीच वर्षांत त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या कामकाजाची दिशा पाहिली असेल. त्यामुळेच त्यांना पुढील काळात शिंदे मुख्यमंत्री होतील, असे वाटत असावे.”
याचवेळी त्यांनी,“प्रकाश आंबेडकर यांचे आशीर्वाद असतील, तर एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकतात,”
असे विधान करून राजकीय चर्चांना आणखी हवा दिली.
दरम्यान, मुंबई महापालिकेसह राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांची घोषणा झाल्याने राजकीय वातावरण अधिकच तापले आहे. यापूर्वी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनीदेखील “लवकरच मराठी माणूस देशाचा पंतप्रधान होईल” असे भाकीत व्यक्त केले होते.
या सर्व घडामोडींमुळे सत्तासमीकरणे बदलणार का, कोणत्या दाव्यांना वास्तवाचा आधार मिळणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.








