FAS Tag New Rules | पुणे | देशभरातील राष्ट्रीय महामार्गांवरील टोलनाक्यांवर 1 एप्रिलपासून रोख रक्कम स्वीकारली जाणार नसल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय केंद्र सरकारने जाहीर केला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) मार्फत करण्यात येणार असून टोल वसुली प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल माध्यमातून केली जाईल.
वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, सर्व राष्ट्रीय महामार्गांवरील टोलनाक्यांवर केवळ डिजिटल पेमेंट स्वीकारले जाईल. वाहनधारकांना टोल भरण्यासाठी फास्टॅग किंवा यूपीआय या पर्यायांचा वापर अनिवार्य असेल. गेल्या काही वर्षांत फास्टॅगचा वापर 98 टक्क्यांहून अधिक वाढला असून बहुतांश वाहनांवर फास्टॅग बसविण्यात आले आहेत.
टोलनाक्यांवरील रोख व्यवहारांमुळे सुट्ट्या पैशांवरून होणारे वाद, अतिरिक्त वेळ आणि त्यामुळे निर्माण होणारी वाहतूक कोंडी या समस्या दूर करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. डिजिटल व्यवहारामुळे वाहनांचा वेग कायम राहील, इंधन बचत होईल आणि प्रदूषणात घट होण्यास मदत होईल, असा सरकारचा विश्वास आहे. विशेषतः सणासुदीच्या काळात टोलनाक्यांवरील लांब रांगा कमी होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
सध्याच्या नियमांनुसार वैध फास्टॅगशिवाय टोल लेनमध्ये प्रवेश करणाऱ्या वाहनांना दुप्पट टोल आकारला जातो. तसेच यूपीआयद्वारे पेमेंट करणाऱ्यांना लागू दराच्या 1.25 पट रक्कम भरावी लागते. 1 एप्रिलनंतर रोख व्यवहार पूर्णतः बंद होणार असल्याने वाहनधारकांनी वेळेत फास्टॅग रिचार्ज करून ठेवणे किंवा यूपीआय सुविधा सक्रिय ठेवणे आवश्यक ठरणार आहे.
देशभरातील सुमारे 1150 हून अधिक टोलनाक्यांवर या निर्णयाची अंमलबजावणी होणार असून, यामुळे टोल व्यवस्थापन अधिक सुसूत्र, पारदर्शक आणि कार्यक्षम होईल, असा दावा प्रशासनाने केला आहे.







