Girish Mahajan साक्षीदार न्युज | जळगाव, ७ जून २०२५ | राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी जळगावात आयोजित भाजप कार्यशाळेत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना मागील अडीच वर्षांचा काळ निराशाजनक होता, असे सांगत देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदामुळे पक्षाला आणि जनतेला दिलासा मिळाल्याचे मत व्यक्त केले. यावेळी त्यांनी शिवसेना गटावर अप्रत्यक्षपणे टीका करत आगामी निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांना सज्ज राहण्याचे आवाहन केले.
महाजन यांनी कार्यशाळेत सांगितले की, जळगाव जिल्हा हा भाजपचा बालेकिल्ला आहे. लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यातील दोन्ही जागा मोठ्या मताधिक्याने जिंकल्या गेल्या, तर विधानसभेत ११ पैकी ११ जागांवर विजय मिळवून विरोधकांना कोणतीही संधी दिली गेली नाही. यामुळे जळगावची दिल्लीपर्यंत चर्चा आहे, असे त्यांनी अभिमानाने नमूद केले.
आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांवर लक्ष केंद्रित करताना महाजन यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून सांगितले की, जळगाव आणि नाशिक महापालिकेत भाजपने उच्चांक गाठायला हवा. नाशिकच्या १२५ जागांपैकी किमान १०० जागा आणि जळगाव जिल्हा परिषदेत ५० हून अधिक जागा जिंकण्याचे उद्दिष्ट ठेवावे, असे त्यांनी स्पष्ट केले. “हे यश केवळ एकट्याचे नाही, तर कार्यकर्त्यांच्या मेहनतीवर अवलंबून आहे,” असे ते म्हणाले.
महाजन यांनी विरोधकांवरही जोरदार टीका केली. “काही लोक प्रसिद्धीसाठी बडबड करतात, पण त्यांची अवस्था सर्वांना माहीत आहे. त्यांच्याकडे कोणी विचारत नाही, म्हणून ते आपल्यावर बोलून प्रसिद्धी मिळवतात,” असे म्हणत त्यांनी नाव न घेता एकनाथ खडसे आणि संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला. “आपण अशा भानगडीत पडू नका, फक्त कामावर लक्ष द्या,” असा सल्ला त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.
महायुतीच्या भवितव्याबाबत बोलताना महाजन म्हणाले, “महायुती झाली तर उत्तम, पण ती झाली नाही तरी जळगावात ५० पेक्षा जास्त जागा जिंकायलाच हव्यात.” सध्या जिल्ह्यातील बहुतांश पंचायत समित्या आणि ग्रामपंचायतींवर भाजपचे वर्चस्व आहे, याचा उल्लेख करत त्यांनी कार्यकर्त्यांना जोमाने काम करण्यास प्रोत्साहित केले.
या कार्यशाळेत भाजप कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला आणि आगामी निवडणुकांसाठी रणनीती ठरविण्यात आली.