साक्षीदार | २७ ऑक्टोबर २०२३ | जळगाव शहरातील कांचनगरात राहणाऱ्या एका ८५ वर्षीय वृद्धाचा धावत्या रेल्वेखाली आल्याने मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सकाळी सात वाजता उघडकीला आली. अर्जुन भिवसन चौधरी (वय ८५, रा. कांचननगर) असे मयत वृद्धाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील कांचन नगरात अर्जुन चौधरी हे पत्नी आणि चार मुलांसह वास्तव्याला होते. वृद्ध असल्यामुळे गेल्या काही वर्षांपासून घरीच होते. रोज पहाटे मॉर्निंग वॉक करण्यासाठी जात होते. गुरुवारी सकाळी ६:३० वाजेच्या सुमारास ते नेहमीप्रमाणे फिरण्यासाठी घराबाहेर गेले होते. जळगाव ते भादली दरम्यानच्या रेल्वे खांब क्रमांक ४२१ -२ जवळ एका धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सकाळी सात वाजता उघडकीला आले. परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी त्यांची ओळख पटविली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर शनिपेठ पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचाऱ्यांनी धाव घेऊन मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला. याप्रकरणी शनिपेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, चार मुले, सुना व नातवंडे असा परिवार आहे. पुढील तपास पोहेकॉ. परेश जाधव करीत आहेत.