साक्षीदार न्यूज नेटवर्क | २१ फेब्रुवारी २०२४ | जळगाव जिल्हा पोलीस दलातील बदली प्रक्रिया नुकत्याच पार पडली. पोलीस दलात राजकीय हस्तक्षेप नेहमीच होत असतो, अलीकडच्या काळात हस्तक्षेप जरा जास्तच वाढला आहे. नुकतेच झालेल्या पोलीस बदली प्रक्रियेत एका मिनी मंत्र्याने देखील मंत्री महोदयांच्या नावाने हस्तक्षेप केल्याची चर्चा पोलीस दलात रंगत आहे. केवळ पोलीस प्रशासन नव्हे तर इतर विभागातही या मिनी मंत्रीकडून हस्तक्षेप वाढला आहे.
जळगाव जिल्हा पॉवरफुल्ल नेत्यांचा जिल्हा आहे. जळगाव जिल्ह्याला तीन दिग्गज मंत्री लाभले असून तीघे सत्ताधारी पक्षाच्या तीन पक्षाचे मंत्री आहेत. जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबरावजी पाटील हे शिवसेनेचे नेते, राज्याचे संकट मोचक गिरीशभाऊ महाजन हे भाजपचे नेते आणि गृहमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांचे खास तसेच उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्या गोटातील राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री ना.अनिलदादा पाटील हे आहेत. तिन्ही मंत्री राज्यात दमदार असून राज्यातील सत्तेच्या केंद्रस्थानी असतात. जिल्हयातील कोणतेही खाते असो किंवा कोणताही विभाग असो तिन्ही मंत्र्यांचा शब्द कधी खाली जात नाही.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात सध्या सर्वच विभागातील बदली प्रक्रिया पार पडली. जळगावात देखील पोलीस, महसूल विभागातील बदल्या झाल्या, केवळ उपप्रादेशिक परिवहन अधिकारी त्याला अपवाद आहेत. जळगावात पोलीस दलातील बदल्या करताना मावळते पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांनी जवळपास प्रत्येकाला न्याय देण्याचा प्रयत्न केला. शिफारसीनुसार आलेल्यापैकी क्वचित एखादा राहिला असेल. अधिकारी असो वा कर्मचारी.. मंत्र्यांनी आणि आमदार खासदारांनी सांगितलेल्या प्रत्येकाला मनासारखी पोस्टिंग मिळाली. सर्व बदली प्रक्रियेत एका व्यक्तीची जास्त चर्चा राहिली ती म्हणजे ‘मिनी मंत्री’.
हे मिनी मंत्री महोदय यांच्या जवळील असल्याचे सांगत अलीकडच्या काळात प्रकाशझोतात आलेल्या या मिनीमंत्रीचे चर्चे दिवसेंदिवस वाढत चालले आहे. काही महिन्यांपूर्वी जळगाव मनपा इमारती समोर उपोषणाला बसलेल्या भाजपच्या एका पदाधिकाऱ्याला देखील आश्वासन देत त्याच्या मनात गैरसमज निर्माण करण्याचे काम या मिनीमंत्रीने केले होते. पोलीसदलात मिनी मंत्रीचा हस्तक्षेप वाढला असून गुन्हा दाखल करण्यापासून, संशयित जमा करणे आणि अधिकाऱ्यांना सूचना करण्यापर्यंतची पोहोच मिनी मंत्रीची झाली आहे. काही महिन्यांपूर्वी एका गुटका प्रकरणात मंत्रिमहोदयांनी या मिनीमंत्र्याला खडसावले असल्याची दबक्या आवाजात चर्चा होत होती.
आपल्याकडे ‘चहापेक्षा किटली गरम’ अशी म्हण प्रचलित आहे. सध्या मिनी मंत्र्यांच्या बाबतीत देखील तोच प्रकार दिसून येतो. मंत्री महोदयांशी संबंधित कोणतेही काम असले तरी जनसामान्य आणि अधिकारी मिनी मंत्र्यांशी संपर्क करतात. पोलीसदलातील काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी त्यांची चांगली गट्टी असून त्यामाध्यमातून ते अधिकाऱ्यांची देखील कानभरणी देखील करतात. मंत्र्यांच्या मनात एखाद्याबद्दल कशी प्रतिमा निर्माण करायची आणि त्याचा पुढे कसा पाठपुरावा करायचा हे काम मिनी मंत्र्यांना सहज जमते. मिनी मंत्री केवळ पोलीस दलातच नव्हे तर कमी अधिक प्रमाणात सर्वच खात्यात डोकावत असून दिवसेंदिवस त्यांचा हस्तक्षेप वाढत आहे. सध्या सुरू असलेल्या या प्रकाराला मंत्री महोदयांनी आवर घातला नाही तर उद्या उठून मंत्री महोदयांच्या नावेच खापर फुटेल हे मात्र निश्चित.







