Jalgaon News जळगाव | साक्षीदार न्यूज | जळगाव शहरातील दुभाजक आणि चौकांच्या सुशोभीकरणाचा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. शहराच्या सौंदर्यवृद्धीसाठी जळगाव शहर महानगरपालिकेचे माजी महापौर नितीन बालमुकुंद लढ्ढा यांनी महापौर आणि आयुक्तांना पत्र लिहून शहरातील ११ प्रमुख चौकांचे तातडीने सुशोभीकरण करण्याची मागणी केली आहे.
सध्या शहरातील काही दुभाजकांचे सुशोभीकरण विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून सुरू असून त्या उपक्रमाचे स्वागत करतानाच लढ्ढा यांनी पत्रातून शहरातील मध्यवर्ती व अत्यंत महत्त्वाच्या चौकांची दुरवस्था अधोरेखित केली आहे. अनेक चौकांमध्ये साफसफाई, रंगरंगोटी, प्रकाशयोजना आणि हरितीकरणाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
सुशोभीकरणासाठी प्रस्तावित ११ चौक:
१) लाल बहादूर शास्त्री टॉवर चौक0
२) चित्रा चौक
३) कोंबडी बाजार चौक
४) पुष्पलता वेंडाळे चौक
५) नेरीनाका चौक
६) अजिंठा चौक
७) इच्छादेवी चौक
८) आकाशवाणी चौक
९) ख्वाजामिया चौक
१०) कोर्ट चौक
११) पांडे डेअरी चौक
या चौकांचे सुशोभीकरण लोकसहभागातून किंवा महानगरपालिकेच्या माध्यमातून तातडीने करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
दरम्यान, दिनांक १२ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी ३ वाजता आयुक्तांच्या दालनात दुभाजक व चौक सुशोभीकरणाबाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत संबंधित ११ चौकांबाबत सकारात्मक निर्णय घेऊन प्रत्यक्ष कामाला गती मिळेल, अशी अपेक्षा नितीन लढ्ढा यांनी व्यक्त केली आहे.
लोकप्रतिनिधींनी शहराच्या सौंदर्यीकरणासाठी आक्रमक भूमिका घेतल्याने आता प्रशासनाची पुढील पावले काय असतील, याकडे जळगावकरांचे लक्ष लागले आहे.







