Government Jobs जळगाव | मिलिंद जंजाळे | कोविड-१९ महामारीच्या काळात जीव धोक्यात घालून रुग्णांची सेवा करणाऱ्या कंत्राटी कामगारांवर अन्याय होत असल्याचा आरोप पुढे आला आहे. कोरोना काळात अग्रभागी राहून काम करणाऱ्या या “कोरोना योद्ध्यांना” आज कामापासून दूर ठेवण्यात आल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
साई मॅन पॉवर सर्विसेस या कंपनीमार्फत कक्षसेवक म्हणून कार्यरत असलेल्या अनेक कामगारांनी कोविड रुग्णांची सेवा करताना स्वतःही संसर्गाचा सामना केला होता. त्या भीषण काळात, जेव्हा अनेक जण रुग्णांपासून दूर राहत होते, तेव्हा या कामगारांनी अत्यंत धैर्याने आपली जबाबदारी पार पाडली. मात्र, परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर या कामगारांना कामावरून कमी करण्यात आल्याचा आरोप आहे.
दरम्यान, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे वर्ग-३ व वर्ग-४ पदांसाठी नवीन कंत्राट स्मार्ट कंपनीला देण्यात आले. या भरती प्रक्रियेत अनुभवी जुन्या कामगारांना डावलून इतरांना संधी दिल्याची चर्चा रंगत आहे.
कोविड काळात केवळ कक्षसेवकच नव्हे, तर बेड सहाय्यक, डाटा एन्ट्री ऑपरेटर, आया, ॲम्बुलन्स चालक, सुरक्षा रक्षक आणि सफाई कर्मचारी यांनीही महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. मात्र सध्या हे सर्व कामगार बेरोजगारीच्या संकटाला सामोरे जात असून त्यांच्या कुटुंबांवर आर्थिक ताण निर्माण झाला आहे.
या पार्श्वभूमीवर “कोरोना योद्धा संघर्ष समिती” आक्रमक झाली असून, अनुभवी कामगारांना त्यांच्या सेवेनुसार पुन्हा कामावर घेण्याची मागणी करण्यात आली आहे. यासाठी समितीच्या शिष्टमंडळाने हसन मुश्रीफ यांची मंत्रालय, मुंबई येथे भेट घेऊन दिनांक १८ मार्च २०२६ रोजी निवेदन सादर केले.
या वेळी निलेश बोरा, बबन सावळे, निलेश तायडे, रवींद्र कोळी, प्रशांत सोनवणे, विनोद सपकाळे, विलास तायडे आदी उपस्थित राहून शासनाने तात्काळ हस्तक्षेप करावा, अशी मागणी केली.
कोरोना काळात जीव धोक्यात घालून सेवा करणाऱ्या कामगारांना आज दुर्लक्षित का केले जात आहे, असा सवाल उपस्थित होत आहे. या “कोरोना योद्ध्यांचा” सन्मान केवळ शब्दांपुरता मर्यादित राहणार का, याकडेही लक्ष वेधले जात आहे.








