Jalgaon Health Department जळगाव | मिलिंद जंजाळे | जिल्ह्यातील आरोग्य विभागात सध्या एका मोठ्या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे. पारोळा येथील कुटीर रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. जितेंद्र अशोक पाटील यांच्या बेकायदेशीर कामकाजाबाबत गंभीर तक्रारींची दखल घेत प्रशासनाने अखेर आक्रमक पवित्रा घेतला आहे. जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाने या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी अधिकृत विभागीय चौकशी समिती स्थापन केली असून, दोषींवर टांगती तलवार निर्माण झाली आहे.
तक्रारीनंतर प्रशासन ‘ॲक्शन मोड’मध्ये
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव येथील दिनेश कडु भोळे यांनी ५ जानेवारी २०२६ रोजी डॉ. जितेंद्र पाटील यांच्या विरोधात तक्रार अर्ज सादर केला होता. या तक्रारीची दखल घेत नाशिक मंडळाच्या आरोग्य सेवा उपसंचालकांनी ५ मार्च २०२६ रोजी पत्र निर्गमित केले होते. या पत्राच्या अनुषंगाने जिल्हा शल्य चिकित्सकांनी ही चौकशी समिती गठीत केली आहे. या कारवाईमुळे आरोग्य यंत्रणेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या घटकांना चपराक बसली आहे.
३ सदस्यीय चौकशी समिती
या प्रकरणातील सत्यासत्यता पडताळून पाहण्यासाठी प्रशासनाने तीन अनुभवी सदस्यांची समिती नियुक्त केली आहे:
-
डॉ. सतिष व्ही. टाक (वैद्यकीय अधीक्षक, ग्रा.रु. पाचोरा) – अध्यक्ष
-
डॉ. प्रकाश ताळे (वैद्यकीय अधीक्षक, ग्रा.रु. अमळनेर) – सदस्य
-
श्री. रविंद्र अमृतकर (कार्यालयीन अधीक्षक, जि.रु. जळगाव) – सदस्य
७ दिवसांचा अल्टीमेटम!
समितीला या प्रकरणातील सर्व कागदपत्रांची बारकाईने तपासणी करणे, संबंधित व्यक्तींचे जबाब नोंदवणे आणि प्रत्यक्ष वस्तुस्थितीचा सखोल अभ्यास करण्याचे निर्देश दिले आहेत. विशेष म्हणजे, प्रशासनाने केवळ ७ दिवसांच्या आत स्वयंस्पष्ट अभिप्रायासह अहवाल सादर करण्याचे आदेश दिल्याने या चौकशीला कमालीचा वेग आला आहे.
आरोग्य विभागातील या अंतर्गत ‘सर्जिकल स्ट्राईक’मुळे सामान्य नागरिकांमधून समाधान व्यक्त होत असून, दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई होणार का? याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.








