Jalgaon Municipal Election साक्षीदार न्यूज । सुनिल भोळे । जळगाव महानगरपालिका निवडणुकीतील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचाराचा अधिकृत शुभारंभ रविवारी पिंप्राळा भागातील भवानी माता मंदिर परिसरातून उत्साहात करण्यात आला. या प्रचाररॅलीला भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह महायुतीतील अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते. घोषणाबाजी, झेंडे आणि कार्यकर्त्यांच्या गर्दीमुळे परिसरात निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले होते.
मात्र या रॅलीदरम्यान एक वेगळे आणि अस्वस्थ करणारे दृश्य अनेकांच्या लक्षात आले. प्रचारात लहान मुलं आणि मुली मोठ्या संख्येने सहभागी असल्याचे दिसून आले. काही चिमुकल्यांच्या हातात पक्षाचे झेंडे, पोस्टर्स आणि घोषणाफलक होते. राजकीय प्रक्रियेची जाण नसलेल्या वयातील मुलांचा प्रचारात सहभाग पाहून उपस्थित नागरिकांमध्ये चर्चा सुरू झाली.
एकीकडे “२०४७ पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवायचे आहे,” असा संदेश देत महायुतीचे नेते जनतेकडे पाठिंब्याची मागणी करत आहेत. स्वतः रवींद्र चव्हाण यांनीही विकसित भारताच्या संकल्पनेचा उल्लेख करत मतदारांना आवाहन केले. मात्र त्याचवेळी, ज्यांचे बालपण शिक्षण, खेळ आणि सुरक्षित वातावरणात घडावे अशी अपेक्षा आहे, त्या मुलांना राजकीय प्रचाराच्या गर्दीत उभे केले जात असल्याचे चित्र अनेकांना विचारात पाडणारे ठरले.
या मुलांचा सहभाग हा केवळ उत्स्फूर्त सहभाग आहे की पालकांच्या सामाजिक-आर्थिक परिस्थितीमुळे निर्माण झालेली गरज, हा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित होत आहे. वास्तवात अनेक कुटुंबांमध्ये परिस्थिती कठीण असल्याने मुलांना आई-वडिलांना मदत करावी लागते. मात्र अशा पार्श्वभूमीवर निवडणूक प्रचारात मुलांचा सहभाग कितपत योग्य आहे? असा थेट सवाल नागरिक विचारत आहेत.
बालहक्क, बालश्रम प्रतिबंध आणि मुलांच्या संरक्षणासाठी कायदे अस्तित्वात असताना, राजकीय प्रचारात चिमुकल्यांचा वापर किंवा सहभाग यावर निवडणूक यंत्रणा व संबंधित अधिकाऱ्यांनी स्पष्ट भूमिका घ्यावी, अशी मागणीही पुढे येत आहे.
महायुतीच्या या प्रचाररॅलीने निवडणूक रंगत वाढवली असली, तरी पिंप्राळ्यात दिसलेल्या या दृश्यामुळे राजकीय प्रचाराच्या पद्धतींवर नव्याने चर्चा सुरू झाली आहे.







