Local Government Elections जळगाव । साक्षीदार न्यूज । राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजताच सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी आपली रणनीती निश्चित करण्यास सुरुवात केली आहे. अशातच, जळगावमधून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या जिल्हाध्यक्षांनी एक अत्यंत महत्त्वाचे आणि राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणारे विधान केले आहे.
भाजपला रोखण्यासाठी तयारी
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे जळगाव जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील यांनी स्पष्ट केले आहे की, “भाजप हा आमचा पहिला क्रमांकाचा शत्रू आहे आणि राज्यातील लोकशाही वाचवण्यासाठी पैशांच्या जोरावर उधळलेला भाजपचा वारू रोखणे गरजेचे आहे. त्यामुळे भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी गरज पडल्यास शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यासह कोणत्याही समविचारी पक्षासोबत आघाडी करण्याची आमची तयारी आहे.”
नैसर्गिक आघाडीसोबतच अन्य पर्याय खुले
पाटील यांनी सांगितले की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षश्रेष्ठींकडून भाजप सोडून अन्य कोणत्याही राजकीय पक्षांशी युती करण्याचे स्पष्ट आदेश आहेत. आमची नैसर्गिक आघाडी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), काँग्रेस आणि समविचारी पक्षांशी असेलच, मात्र महाविकास आघाडीतील घटकपक्षांशी चर्चा करून, भाजपला रोखण्यासाठी शिंदे गट किंवा अजित पवार गटाशीही युतीचा निर्णय घेता येईल.
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार का, याबद्दल चर्चांना उधाण आले आहे. बीडमध्येही शरद पवार गटाच्या एका स्थानिक नेत्याने दोन्ही गट एकत्र येण्याचे संकेत दिले होते. तसेच, कोल्हापूरमधील चंदगड येथे अजित पवार गटाचे नेते हसन मुश्रीफ यांच्या मध्यस्थीने दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र निवडणूक लढणार असल्याचे निश्चित झाले आहे. या पार्श्वभूमीवर, जळगावमधील प्रमोद पाटील यांचे हे वक्तव्य महत्त्वाचे मानले जात आहे.
भाजपची नवी रणनीती आणि शरद पवार गटाचा दबाव
दरम्यान, मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली भाजपने जिल्ह्यात आपले राजकीय वर्चस्व सिद्ध केले आहे. आगामी निवडणुकांमध्ये भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) एकत्र लढतात की स्वतंत्र, याबद्दल अजूनही अनिश्चितता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, भाजपने महाविकास आघाडीतील, विशेषत: शरद पवार गटातील, काही प्रभावशाली नेत्यांना आपल्याकडे वळवण्यासाठी संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळेच, भाजपच्या या संभाव्य खेळीला शह देण्यासाठी शरद पवार गटाकडून शिंदे गट आणि अजित पवार गटाशीही हातमिळवणी करण्याची तयारी दाखवली जात असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.








