Agriculture News | साक्षीदार न्यूज | राज्यातील शेतकऱ्यांना २०१७ मध्ये दीड लाख रुपयांपर्यंत, तर २०१९ मध्ये दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्यात आली होती. मात्र ही रक्कम मर्यादित असल्यामुळे अनेक शेतकरी या योजनांच्या लाभापासून वंचित राहिले होते. आता मात्र राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय घेत संपूर्ण कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे.
राज्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्यासाठी सहकार विभागाकडून जिल्हानिहाय माहिती मागविण्यात आली आहे. या प्रक्रियेवर अभ्यास करण्यासाठी प्रविणसिंह परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली विशेष अभ्यास समिती नेमण्यात आली आहे. ही समिती एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आपला अहवाल राज्य सरकारकडे सादर करणार आहे.
अहवाल प्राप्त झाल्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकार अंतिम निर्णय घेणार असून, ३० जूनपूर्वी राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचा प्रत्यक्ष लाभ देण्याचा मानस सरकारचा असल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे.
या घोषणेमुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून, सध्या कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकऱ्यांमध्ये नव्या आशेचे वातावरण निर्माण झाले आहे
राज्यातील शेतकऱ्यांना ३० जूनपूर्वी संपूर्ण कर्जमाफी दिली जाणार असल्याची घोषणा कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केली आहे. जिल्हानिहाय माहिती संकलन सुरू.







