Maharashtra Weather | साक्षीदार न्यूज | महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाचा जोर आता कमी झाला असून राज्यातून पावसाने माघार घेतल्याचे चित्र दिसत आहे. मात्र, या दिलास्यानंतर आता उष्णतेचे संकट डोके वर काढताना दिसत आहे.
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, राज्यात पुढील पाच दिवसांत कमाल तापमानात लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे. अनेक भागांमध्ये तापमान 40 अंश सेल्सिअसच्या पुढे जाण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना तीव्र उकाड्याचा सामना करावा लागू शकतो. गेल्या काही दिवसांतील ढगाळ वातावरण आणि पावसामुळे तापमानात घट झाली होती. मात्र, आता आकाश निरभ्र होत असल्याने सूर्याचा तडाखा वाढू लागला आहे. पुढील काळात उन्हाचा कडाका आणखी तीव्र होण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तवली आहे.
हवामान विभागाच्या चार आठवड्यांच्या अंदाजानुसार, एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यापासून ते मेच्या पहिल्या आठवड्यापर्यंत तापमानात सातत्याने वाढ होण्याची शक्यता आहे. विशेषतः विदर्भ, मराठवाडा आणि जळगाव पट्ट्यात तापमान 40 अंशांच्या पुढे जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. सध्या 35 अंशांच्या आसपास असलेला पारा पुढील काही दिवसांत 5 ते 6 अंशांनी वाढू शकतो. दरम्यान, कोकण किनारपट्टीवरील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. या भागांमध्ये तापमान 34 ते 38 अंशांच्या दरम्यान राहण्याचा अंदाज असला तरी, हवेतील आर्द्रतेमुळे प्रत्यक्ष जाणवणारी उष्णता अधिक तीव्र असणार आहे.
दमट आणि उष्ण हवामानामुळे आरोग्याच्या समस्या वाढण्याची शक्यता लक्षात घेता नागरिकांना विशेष खबरदारी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. विशेषतः दुपारच्या वेळेत घराबाहेर पडणे टाळावे, पुरेसे पाणी पिणे आणि शरीराला थंड ठेवण्याचे उपाय करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.









