Jal Jeevan Mission मुंबई | जळगाव | साक्षीदार न्यूज | महाराष्ट्र शासन आणि Quality Council of India (QCI) यांच्या संयुक्त मूल्यमापनातून राबविण्यात आलेल्या १५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात राज्यातील ५७ मंत्रालयीन विभागांपैकी पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने उल्लेखनीय कामगिरी करत राज्यात तिसरा क्रमांक पटकावला आहे. या विभागाला २०० पैकी १७०.५० गुण मिळाले असून, ही कामगिरी प्रशासकीय वर्तुळात विशेष लक्षवेधी ठरली आहे.
हा विभाग जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत आहे. या मूल्यमापनात सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रथम, तर वन विभागाने द्वितीय क्रमांक मिळवला असला, तरी ग्रामीण जीवनाशी थेट निगडित आणि नागरिकांच्या दैनंदिन गरजांशी जोडलेला पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग अव्वल तीनमध्ये पोहोचणे ही मोठी प्रशासकीय उपलब्धी मानली जात आहे.
‘नळाला पाणी, गावात स्वच्छता’ हे ध्येय प्रत्यक्षात
राज्यातील गावागावांत नळ पाणीपुरवठा योजना, जलजीवन मिशनची प्रभावी अंमलबजावणी, शौचालये, घनकचरा व्यवस्थापन, स्वच्छ गाव अभियान, डिजिटल फाईलिंग, वेळेत निर्णयप्रक्रिया आणि नागरिकाभिमुख सेवा—या सर्व बाबींमध्ये विभागाने सातत्य राखले आहे. “काम कागदावर नव्हे, तर गावात दिसले पाहिजे,” ही भूमिका घेत प्रशासनाला कृतीशील ठेवण्यावर भर दिल्याचे प्रशासनातील अधिकारी सांगतात.
जळगाव जिल्ह्यालाही राज्यात अव्वल मानांकन
याच पार्श्वभूमीवर आणखी एक महत्त्वाची नोंद म्हणजे, ज्या जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून गुलाबराव पाटील जबाबदारी सांभाळत आहेत, त्या जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयानेही राज्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे. मंत्री आणि जिल्हा प्रशासनातील समन्वय, शिस्तबद्ध नियोजन आणि गतिमान अंमलबजावणीचे हे उत्तम उदाहरण ठरत असल्याची चर्चा आहे.
‘गुलाबराव पाटील पॅटर्न’ची चर्चा
राज्यभर समान दर्जाची सेवा, डिजिटल ट्रॅकिंग, लोकसहभाग आणि प्रशासनावर काटेकोर नियंत्रण—या चार आधारांवर विभागाची कामगिरी उभी राहिल्याचे दिसते. त्यामुळे कामात वेग, निर्णयात ठामपणा आणि अंमलबजावणीत शिस्त असा ‘गुलाबराव पाटील पॅटर्न’ इतर विभागांसाठीही प्रेरणादायी ठरत असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
या यशामुळे पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग म्हणजे केवळ योजना नव्हे, तर प्रत्यक्ष परिणाम देणारा विभाग अशी प्रतिमा अधिक बळकट झाली असून, ग्रामीण महाराष्ट्राच्या जीवनमानात सुधारणा घडवणाऱ्या नेतृत्वाची ही पोचपावती असल्याचे मानले जात आहे.







