Maharashtra Zilla Parishad election 2026 | साक्षीदार न्यूज |नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. राज्यातील राहिलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांचा बिगुल वाजण्याची तयारी अंतिम टप्प्यात आली असून, निवडणूक यंत्रणा सज्ज झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
आरक्षणाच्या तिढ्यामुळे या निवडणुका दोन टप्प्यांत घेण्याचा विचार सुरू आहे. राज्यातील एकूण ३२ जिल्हा परिषदांपैकी पहिल्या टप्प्यात १२ जिल्हा परिषद आणि ३३६ पैकी १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुका घेण्याचा आयोगाचा मानस असल्याचे समजते. या निवडणुकांचा संपूर्ण कार्यक्रम सुमारे २१ दिवसांत पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची दाट शक्यता असून, ८ जानेवारीपूर्वी संबंधित जिल्ह्यांमध्ये आचारसंहिता लागू होऊ शकते. त्यामुळे राजकीय पक्षांनी आतापासूनच तयारीला वेग दिल्याचे चित्र आहे.
दरम्यान, Supreme Court of India ने राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी ३१ जानेवारी २०२६ पर्यंतची मुदत दिली आहे. मात्र, काही जिल्ह्यांमध्ये आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांपेक्षा जास्त असल्यामुळे सध्या २० जिल्हा परिषद आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका स्थगित ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे पहिल्या टप्प्यात मर्यादित जिल्ह्यांमध्येच निवडणुका होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पहिल्या टप्प्यात ५० टक्के आरक्षण मर्यादेचे पालन झालेल्या जिल्ह्यांमध्ये निवडणूक प्रक्रिया राबवली जाणार आहे. या टप्प्यात सोलापूर,रायगड,रत्नागिरी,सिंधुदुर्ग,पुणे,सातारा,सांगली,कोलीहापूर,छत्रपती संभाजीनगर,परभणी,धाराशिव आणि लातूर या जिल्ह्यांचा समावेश असल्याची चर्चा आहे.
उर्वरित २० जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका आरक्षणासंदर्भातील अडचणी दूर झाल्यानंतर, म्हणजेच ३१ जानेवारीनंतर घेण्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे सर्वांचे लक्ष लागले असून, येत्या काही दिवसांत निवडणूक कार्यक्रमाबाबत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.







