साक्षीदार | १५ ऑक्टोबर २०२३ | देशभरातील अनेक शाळेची फी भरणे अनेक पालकांना परवडत नसते पण शिक्षण आता स्वस्त राहिलेले नाही. असे असताना, आसाममधील एका शाळेत मात्र वेगळ्याच पद्धतीचे शुल्क वसूल करण्यात येते. तेथे मुलांकडून शिक्षणशुल्क म्हणून दर आठवड्याला चक्क प्लास्टिकच्या बाटल्यांचा कचरा घेतला जातो.
अक्षर फाऊंडेशन नामक एका संस्थेने गोरगरीब मुलांसाठी ही शाळा उभारली आहे. यातील अनेक मुलांच्या पालकांकडे रोजच्या जेवणासाठीही पैसे नसतात, तेथे ते शिक्षणशुल्क कुठून भरणार? मात्र त्यांच्या मुलांच्या शिक्षणावर याचा परिणाम होऊ नये म्हणून शाळेने सर्व मुलांकडून दर आठवड्याला प्लास्टिकच्या २५ बाटल्या शुल्क म्हणून घेण्याचा निर्णय घेतला.
या शाळेचे सहसंस्थापक परमिता शर्मा आणि मझीन मुख्तार यांनी सांगितले की, २०१६ मध्ये या शाळेची स्थापना करण्यात आली. तेव्हाच प्लास्टिकच्या बाटल्या शुल्क म्हणून घेण्याचे आम्ही ठरवले. आज प्लास्टिकचा भस्मासूर सर्वव्यापी झालेला आहे. एव्हरेस्ट शिखरापासून समुद्राच्या तळापर्यंत सर्वत्र प्लास्टिकच्या कचऱ्याने थैमान घातले आहे. त्यावर एक उपाय आहे ‘रिसायकलिंग’चा, प्लास्टिकच्या पुनर्वापराचा. त्यासाठी अनेक स्तरांवर प्रयत्न सुरू आहेत. त्यातलाच हा एक प्रयत्न आहे. येथे जमा होणारा प्लास्टिकचा कचरा विटा, रस्ते तसेच प्रसाधनगृहे बांधण्यासाठी वापरला जातो. या शाळेमध्ये अन्य नेहमीच्या विषयांबरोबरच भाषा, सुतारकाम, बागकाम तसेच प्लास्टिक रिसायकलिंगचेही शिक्षण देण्यात येते. या शाळेतील मोठी मुलेच आता लहान मुलांना रिसायकलिंगचे धडे देत असतात. प्लास्टिकच्या बाटल्या गोळा करण्यातून या मुलांना पैसेही मिळतात. एक प्रकारे कमवा आणि शिका अशा प्रकारचेच शिक्षण तेथे दिले जाते. नागालँडमधील एक राजकीय नेते तेमजेन इम्ना अलोंग यांनी नुकतीच याबाबतची ध्वनिचित्रफीत ट्विटरवरून प्रसिद्ध केली. तिला ट्विटर खातेदारांकडून चांगलीच वाहवा मिळत आहे.








