Pune Jalgaon Expressway | साक्षीदार न्यूज | पुणे ते छत्रपती संभाजीनगर आणि पुढे जळगावपर्यंतचा प्रवास अधिक वेगवान करण्यासाठी केंद्र सरकारने नवीन एक्सप्रेस वे उभारण्याची घोषणा केली आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी या प्रकल्पाबाबत माहिती दिली असून, हा महामार्ग पूर्ण झाल्यानंतर महाराष्ट्राच्या दळणवळण व्यवस्थेत मोठा बदल घडण्याची शक्यता आहे.
पुणे आणि छत्रपती संभाजीनगर या दोन प्रमुख शहरांना जोडणारा हा आत्याधुनिक एक्सप्रेस वे प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी करणार आहे. सध्या या दोन शहरांदरम्यान प्रवासासाठी सहा ते साडेसहा तास लागतात. मात्र, नवीन महामार्गामुळे हा प्रवास अवघ्या दोन तासांत पूर्ण करता येईल, असा दावा करण्यात आला आहे.
पुणे ते जळगावचा प्रवासही होणार जलद
या एक्सप्रेस वेचा फायदा केवळ पुणे आणि छत्रपती संभाजीनगरपुरता मर्यादित राहणार नाही. या मार्गामुळे पुणे ते जळगावचे अंतरही लक्षणीयरीत्या कमी होणार आहे. सध्या जळगावहून अजिंठा आणि सिल्लोडमार्गे छत्रपती संभाजीनगरला पोहोचण्यासाठी सुमारे अडीच तास लागतात.
नव्या योजनेनुसार, जळगाव ते छत्रपती संभाजीनगर असा स्वतंत्र एक्सप्रेस वे उभारण्यात येणार असून, हा मार्ग पुढे समृद्धी महामार्गाशी जोडला जाणार आहे. त्यामुळे जळगाव ते छत्रपती संभाजीनगर हा प्रवास केवळ एका तासात पूर्ण होऊ शकणार आहे.
समृद्धी महामार्गाशी थेट जोडणी
मुंबई–नागपूर समृद्धी महामार्गाला जळगाव जोडण्याचा निर्णय देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत घेण्यात आला आहे. या जोडणीमुळे उत्तर महाराष्ट्राचा संपर्क अधिक मजबूत होणार असून, उद्योग, व्यापार आणि पर्यटनाला चालना मिळण्याची अपेक्षा आहे.
तीन तासांत पुणे ते जळगाव
जळगाव ते छत्रपती संभाजीनगर – सुमारे १ तास
छत्रपती संभाजीनगर ते पुणे – सुमारे २ तास
असा एकूण प्रवास केवळ तीन तासांचा होऊ शकतो. हा एक्सप्रेस वे पूर्ण झाल्यानंतर जळगावहून पुण्याला जाणे अधिक सोपे आणि जलद होणार आहे.
महाराष्ट्राच्या कनेक्टिव्हिटीत मोठा बदल
हा प्रकल्प पूर्ण झाल्यास महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधील प्रवासाचा वेळ कमी होईलच, शिवाय राज्याच्या दळणवळण आणि आर्थिक विकासाला गती मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.







