Raj Thackeray Pahalgam Attack साक्षीदार न्युज । जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल 2025 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे. या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहताना त्यांनी केंद्र सरकारला कठोर कारवाई करण्याचे आवाहन केले आहे. सोशल मीडियावर पोस्ट करताना त्यांनी या घटनेची गंभीरता अधोरेखित केली आणि मनसे या प्रकरणात सरकारच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील, असे आश्वासन दिले.
राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, 370 कलम हटवल्यानंतर काश्मीरमध्ये परिस्थिती सुधारत असल्याचे दिसत होते आणि पर्यटकांचा ओघ वाढत होता. अशा वेळी झालेल्या या हल्ल्यामुळे भविष्यात कोण काश्मीरमध्ये जमीन खरेदी करून उद्योगधंदे सुरू करेल, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. त्यांनी केंद्र सरकारला ठोस आणि कठोर पावले उचलण्याची मागणी केली, जेणेकरून अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही. “हल्लेखोरांच्या पुढच्या 10 पिढ्या थरकतील, असा बंदोबस्त करा,” असे त्यांनी संतप्तपणे सांगितले.
पहलगाम हल्ल्याने संपूर्ण देशात खळबळ उडवून दिली असून, या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी सर्व राजकीय पक्षांना एकजुटीने सरकारच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले आहे. “या प्रकरणात केंद्र सरकार कठोर कारवाई करेल, याबाबत माझ्या मनात काही शंका नाही. पण सरकारने एकदाच असा दणका द्यावा, ज्याचा परिणाम दीर्घकाळ दिसेल,” असे त्यांनी नमूद केले.
या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार आणि स्थानिक प्रशासनाकडून कोणती पावले उचलली जातात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मनसेने आपली भूमिका स्पष्ट करताना सरकारला पूर्ण पाठिंबा जाहीर केला असून, काश्मीरमधील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची तयारी दर्शवली आहे.
धरणगावात बदला प्रकरणात तरुणाची गोळ्या झाडून हत्या, संशयित स्वतः पोलीस ठाण्यात हजर
स्पा सेंटरच्या नावाखाली अनैतिक व्यवसाय; नयनतारा मॉलवर पोलिसांचा छापा, ४ महिलांची सुटका