Ramzan Eid साकळी | मिलिंद जंजाळे | रमजान ईदच्या पवित्र सणानिमित्त साकळी गावात सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि एकोप्याचे प्रेरणादायी चित्र पाहायला मिळाले. विविध समाजातील नागरिकांनी एकत्र येत मुस्लिम बांधवांना गळाभेट देऊन मनापासून शुभेच्छा दिल्या आणि “एकता हीच खरी ताकद” असल्याचा प्रभावी संदेश दिला.
गावात आयोजित शुभेच्छा कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावत समाजात सौहार्द आणि सलोखा टिकवण्याचे आवाहन केले. विशेष म्हणजे, एकमेकांना गळाभेट देत शुभेच्छा देण्याच्या या उपक्रमामुळे कार्यक्रमात भावनिक आणि आपुलकीचे वातावरण निर्माण झाले.
यावेळी प्रगतशील शेतकरी जितेंद्र वसंतराव महाजन, माजी उपसरपंच किरण मधुकर महाजन, विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक शाम वसंतराव महाजन, सामाजिक कार्यकर्ता भरात चौधरी, केळी व्यापारी सचिन चौधरी, वढोदा येथील सरपंच संदीप भैया सोनवणे, नावरे येथील माजी सरपंच समाधान पाटील, सामाजिक कार्यकर्ते नासीर खान नजीर खान, पत्रकार मिलिंद जंजाळे, जयंत बोरसे, दुर्गादास महाजन यांच्यासह अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमादरम्यान सर्व समाज बांधवांनी मुस्लिम बांधवांना गळाभेट देत शुभेच्छा दिल्या. या कृतीतून धर्म, जात आणि पंथ यांच्यातील भेद विसरून परस्परांतील प्रेम, आदर आणि एकोप्याची भावना स्पष्टपणे दिसून आली.
आजच्या तणावपूर्ण सामाजिक वातावरणात साकळी गावाने एकतेचा आदर्श घालून दिला आहे. काही ठिकाणी समाजात फूट पाडण्याचे प्रयत्न होत असताना, साकळीकरांनी एकजुटीने त्याला उत्तर देत समाजाला सकारात्मक दिशा देणारा संदेश दिला आहे.
रमजान ईद हा सण प्रेम, त्याग आणि बंधुभाव शिकवणारा असल्याने, साकळीतील या उपक्रमामुळे “सर्व धर्म समभाव” या विचाराला अधिक बळ मिळाले असून, इतर गावांसाठीही हा एक आदर्श ठरत आहे.








