Mahatma Phule Jayanti साकळी | मिलिंद जंजाळे | समाजजागृती, शिक्षण आणि समानतेचा विचार रुजवणारे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त साकळी येथे उद्या, दि. ११ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता भव्य जाहीर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. महात्मा ज्योतिबा फुले चौक येथे होणाऱ्या या कार्यक्रमामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या व्याख्यानासाठी प्रख्यात वक्ते श्री राजेंद्र माळी (वाघळीकर) उपस्थित राहणार असून ते “मी ज्योतिराव फुले बोलतोय!” या प्रभावी एकपात्री प्रयोगाच्या माध्यमातून महात्मा फुले यांच्या क्रांतिकारी विचारांचे जिवंत दर्शन घडवणार आहेत. या सादरीकरणातून शोषित, वंचित आणि दुर्लक्षित घटकांसाठी लढणाऱ्या फुले यांच्या कार्याची प्रेरणा नव्या पिढीपर्यंत पोहोचणार आहे.
महात्मा फुले यांनी दिलेले संदेश आजही तितकेच प्रेरणादायी ठरतात —
“शिक्षण हेच खरे शस्त्र आहे”,
“ज्याला ज्ञान नाही तो अंध आहे”,
“अन्यायाविरुद्ध लढणे हीच खरी मानवता आहे”.
स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारे, सत्यशोधक समाजाची स्थापना करून सामाजिक समतेचा मार्ग दाखवणारे आणि जातीय व्यवस्थेला ठामपणे विरोध करणारे महात्मा फुले हे आधुनिक भारताच्या सामाजिक परिवर्तनाचे प्रमुख शिल्पकार मानले जातात. या कार्यक्रमाचे आयोजन समस्त माळी समाज साकळी प्रेरित क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्सव समितीतर्फे करण्यात आले आहे. या विचारप्रवर्तक उपक्रमाचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थी, युवक, महिला आणि ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. साकळीत उद्या फुले विचारांचा जागर होणार असून, सामाजिक परिवर्तनाची नवी ज्योत पेटण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.









