Mahatma Phule Jayanti साकळी | मिलिंद जंजाळे | येथे Mahatma Jyotiba Phule यांच्या २०० व्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या एकपात्री व्याख्यानाने परिसरात सामाजिक जागृतीची लाट निर्माण केली. “मी जोतिबा फुले बोलतोय” या प्रभावी सादरीकरणातून व्याख्याते राजेंद्र माळी वाघळीकर यांनी समाजाला समता, शिक्षण आणि न्याय यांचा संदेश दिला.
११ एप्रिल रोजी महात्मा फुले चौकात महात्मा ज्योतिबा फुले उत्सव समितीच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. व्याख्यानादरम्यान वाघळीकर यांनी महात्मा फुले यांच्या जीवनकार्याचा सखोल आढावा घेत अंधश्रद्धा, जातीयता आणि शिक्षणातील विषमता यांवर कठोर भाष्य केले.
“शिक्षण हेच खरे परिवर्तनाचे शस्त्र आहे,” हा महात्मा फुले यांचा विचार अधोरेखित करत त्यांनी समाजाने शिक्षणाच्या माध्यमातून सक्षम बनण्याचे आवाहन केले. तसेच Dr. Babasaheb Ambedkar यांच्या विचारांशी फुले यांच्या तत्वज्ञानाचा संबंध स्पष्ट करत, भारतीय संविधानातील समता, बंधुता आणि न्याय या मूल्यांचा स्वीकार करण्याचे महत्त्व त्यांनी पटवून दिले. “संविधान हे फक्त पुस्तक नसून ते जगण्याची दिशा आहे,” असे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी संत सावता माळी, महात्मा ज्योतिराव फुले आणि माता सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचे पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माळी समाजाचे अध्यक्ष सुभाष नाना भास्कर महाजन होते.
या कार्यक्रमाला सरपंच दिपक नागो पाटील, रमेश महाजन, दिनकर माळी, माजी जिल्हाध्यक्ष संध्या गणेश माळी, माजी शिक्षण व आरोग्य सभापती रविंद्र सूर्यभान पाटील, प्रगतशील शेतकरी जितेंद्र वसंतराव महाजन, माजी उपसरपंच किरण मधुकर महाजन यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. अध्यक्षीय भाषणात सुभाष महाजन यांनी फुले-आंबेडकर विचारांचा मार्ग समाजाच्या प्रगतीसाठी महत्त्वाचा असल्याचे सांगितले. तसेच जितेंद्र महाजन आणि संध्या गणेश माळी यांनी उत्सव समितीचे कौतुक करत तरुणांनी हे विचार पुढे नेण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील महाजन यांनी केले, तर आभार प्रदर्शन गणेश माळी यांनी केले. या एकपात्री व्याख्यानातून साकळी परिसरात समता, शिक्षण आणि सामाजिक न्यायाची नवचेतना निर्माण झाल्याचे चित्र दिसून आले.









