साक्षीदार न्यूज – जळगाव जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून सुरू असलेल्या उपक्रम आणि कार्यक्रमात शासनाच्या पैशांचा चुराडा तर होतोच आहे शिवाय गोरगरिबांचे हाल देखील होत आहेत. नुकतेच झालेल्या मुक्ताई सरस महोत्सवाचे उदाहरण ताजे असतानाच आणखी एक प्रकार समोर आला आहे. जळगाव तालुक्यातील एका गावात उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत उद्घाटन सोहळ्याला उपस्थितीच्या कारणावरून दोघांमध्ये वाद झाल्याची चर्चा आहे.
हा व्हिडिओ जरूर बघा ; – यावर करा क्लिक
Not Good ; जिल्हा परिषदेच्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यामातून मागील काही दिवसापूर्वी पोलीस मैदानावर विभागीय मुक्ताई सरस हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे नियोजन ढासळाल्याने या ठिकाणी आलेल्या अनेक महिलांना मोठ्या प्रमाणावर नुकसान सहन करावं लागले होते. महिलांचे नुकसान झाले मात्र कर्मचाऱ्यांवर याचा कसलाही परिणाम झाला नव्हता. एकीकडे महिला आपले घर दार सोडून आपला काहीतरी व्यवसाय व्हावा या हेतूने या ठिकाणी आल्या होत्या. मात्र त्यांच्या पदरी पडल्या फक्त निराशा. कर्मचाऱ्यांनी मात्र पाच दिवस काम केले म्हणून शेवटच्या दिवशी मटण पार्टी केली. मटणाचा बेत करताना एक कर्मचाऱ्याने मद्यपान करून डोक्यावर भांडे घेवून डान्स केल्याचा व्हिडिओ त्यांच्याच कर्मचाऱ्याने काढल्याची तेव्हा चर्चा होती. या कर्मचाऱ्याबद्दल अधिकाऱ्यांनी काय भूमिका घेतली हे अद्याप गुलदस्त्यातच आहे. या घटनेला काही दिवस होत नाही तोच आज पुन्हा एकदा दोन कर्मचाऱ्यांमध्ये जोरदार वाद झाल्याची चर्चा रंगली आहे.
सोमवारी तालुक्यातील एका गावात उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष जळगाव अंतर्गतच्या एका महिला प्रभाग संघाच्या कार्यालयाच्या उद्घाटनाचा सोहळा आयोजित करण्यात आला होता . या कार्यक्रमाचा सोहळ्याचे उद्घाटन जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राजू लोखंडे यांच्या हस्ते होणार होते. मात्र त्यांना या कार्यक्रमास येण्यास उशीर झाल्याने अतिरिक्त कार्यभार असलेले कंत्राटी प्रभारी जिल्हा अभियान व्यवस्थापक यांना पाचारण करण्यात आले होते. कार्यक्रमाचा फायदा व्हावा म्हणून आयोजकांनी कार्यक्रमासाठी जवळ असलेल्या प्रभागातील महिला व समूह संसाधन व्यक्ती व संबंधित प्रभागाचे समन्वयक यांना देखील आमंत्रित केले होते. तसेच यावेळी उपस्थित महिलांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लखपती दीदी योजनेच्या अंतर्गत महिलांना संबोधन ऑनलाईन दाखविण्यात येणार होते.
उदघाटनाला प्रकल्प संचालक यांना उशीर झाल्यामुळे या महिला उदघाटनाची वाट बघत होत्या. यावेळी तेथे आमंत्रित असलेल्या एका कर्मचाऱ्याला कंत्राटी जिल्हा अभियान व्यवस्थापक उद्धटपणे बोलल्याने दोघांमध्ये बाचाबाची झाल्याचे बोलले जात आहे. दोघांमध्ये कार्यक्रम झाल्यावर चांगलेच जोरदार भांडण झाल्याची चर्चा आहे. सार्वजनिक कार्यक्रमाच्या ठिकाणी वरिष्ठांनी कर्मचाऱ्यांचा अशाप्रकारे अपमान करुन भांडण करणे हे कितपत योग्य आहे? अशा घटनांमुळे या विभागाची बदनामी होत नाही का? प्रकल्प संचालकांचे या व्यवस्थापकांवर नियंत्रण नाही का? असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत. अलीकडे उमेदच्या जिल्हा कक्षातील प्रभारी कर्मचाऱ्यांच्या करामतींमुळे हा विभाग चांगलाच चर्चेत आहे.
याबाबत साक्षीदार न्युजने सत्यता जाणून घेण्यासाठी प्रभारी कंत्राटी जिल्हा अभियान व्यवस्थापक यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की , हो मी त्यांना बोललो की’ तू या ठिकाणी का आला, मी त्याला दुसऱ्या प्रभाग संघात जाण्यास सांगितले होते. आमच्यात असा काही वाद विवाद नाही, असे त्यांनी सांगितले.
या घटनेची दुसरी बाजू जाणून घेण्यासाठी प्रभाग समन्वयक यांनी विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, जिल्हा अभियान व्यवस्थापकांनी कार्यक्रमाचे नियोजन माहिती करून न घेता, ‘तू इथे का आला’ असे रागात बोलून अपमानास्पद वागणूक देवून अरेरावी केली असे संबंधित कर्मचाऱ्याने सांगितले. सर्व घटनेवर जिल्हा अभियान संचालक व राज्य अभियान व्यवस्थापन कक्ष काही करणार का? याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे.







