साक्षीदार | १४ नोव्हेबर २०२३ | देशभरात दिवाळीचा उत्साह सुरु असतांना एसटी महामंडळाने याच पार्श्वभूमीवर ८ ते २८ नोव्हेंबरपर्यंत तिकीट दरात दहा टक्के वाढ केली आहे. त्यामुळे अलिबागमधून लांब पल्ल्याचा प्रवास करताना पाच रुपयांपासून ६५ रुपये अधिक मोजावे लागत आहेत. ऐन दिवाळीत प्रवास करताना प्रवाशांच्या खिशाला कात्री लागली आहे.
दिवाळीनिमित्त सुट्टी असल्याने काही जण कुटुंबीयांसमवेत, तर काही जण मित्रमंडळींसह बाहेरगावी फिरण्यास जातात. पुणे, मुंबई येथील पर्यटकांचीही या ठिकाणी वर्दळ असते. या कालावधीत एसटीतून प्रवास करणाऱ्यांची संख्या अधिक असते. साधारणतः दिवाळीच्या सुट्टीत दर दिवशी २० हजार प्रवासी प्रवास करतात. या प्रवासामुळे एसटी महामंडळाला तिकिटाच्या स्वरूपात आर्थिक बळ मिळते. या हंगामाचा विचार करत एसटी महामंडळाने दिवाळीत २० दिवस तिकीट दरात वाढ केली आहे. पर्यटकांची वर्दळ अलिबागसह अनेक समुद्रकिनारी वाढली आहे. दिवाळी सुट्टीनिमित्त प्रवाशांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे प्रवाशांना या सुट्टीचा आनंद घेत असताना एसटीचा प्रवास करणे अधिक खर्चित होत आहे.







