Talei Shiv Jayanti 2026 | एरंडोल | छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त तळई गावात शिव आर्मी ग्रुप, तळई यांच्या वतीने आयोजित “भव्य शिवजन्मोत्सव सोहळा – २०२६” मोठ्या दिमाखात आणि उत्साहात पार पडला. कार्यक्रमादरम्यान संपूर्ण परिसर शिवमय झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
सोहळ्याची सुरुवात तळई माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थिनींनी सादर केलेल्या शिवगीतावरील नृत्याने झाली. त्यांच्या सादरीकरणाने उपस्थितांमध्ये शिवभक्तीची भावना जागृत झाली. त्यानंतर दीपप्रज्वलन करून तसेच छत्रपती शिवाजी महाराज व बहुजन महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाचा मंगलमय प्रारंभ करण्यात आला.
शिवव्याख्याते लक्ष्मणराव पाटील सर यांनी प्रास्ताविकातून शिवविचारांचे महत्त्व अधोरेखित केले. पुणे येथून विशेष उपस्थित राहिलेल्या शिवव्याख्यात्या शिवकन्या नमिता पाटील यांनी “छत्रपती शिवाजी महाराज आणि आजचे तरुण” या विषयावर अभ्यासपूर्ण आणि प्रेरणादायी मार्गदर्शन केले. ऐतिहासिक दाखले आणि सद्यस्थितीची सांगड घालत त्यांनी स्वराज्य, स्वाभिमान आणि राष्ट्रनिष्ठेचा संदेश दिला.
शालेय स्तरावर घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांतील विद्यार्थ्यांना इंग्रजी व्याकरणाची पुस्तके भेट देण्यात आली. तसेच गावसेवेत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या २२ कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वांचा “तळईरत्न शिवसन्मान पुरस्काराने” गौरव करण्यात आला.
सोहळ्याचा प्रमुख आकर्षण ठरले खानदेशातील पहिले सत्यशोधक कीर्तनकार, माजी पंचायत समिती सभापती एरंडोल, प्रख्यात ॲडव्होकेट हभप आनंदराव नामदेवराव पाटील यांना “तळई भूषण” या जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्याचा क्षण. हा गौरव शिव आर्मी ग्रुपचे संस्थापक यशवंतराव पाटील, वैचारिक स्वराज्य संस्थेचे संस्थापक दिनेश महाराज पाटील व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
अध्यक्षीय भाषणात अण्णासाहेबांनी सन्मानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत युवकांच्या संघटित कार्याचे कौतुक केले. अल्पवयात गावासाठी झटणाऱ्या आयोजकांच्या जिद्दीचे त्यांनी अभिनंदन केले.
समारोपप्रसंगी हभप दिनेश महाराज पाटील यांनी “माणसाचे वय नव्हे तर मन मोठे असणे महत्त्वाचे आहे,” असे विचारपूर्ण मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश तामस्वरे सर यांनी केले. आयोजनासाठी यशवंत खुशाल पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचा समारोप पसायदानने झाला.
शिवजयंतीचा हा देखणा सोहळा तळई नगरीतील सांस्कृतिक, वैचारिक आणि सामाजिक ऐक्याचा प्रेरणादायी अविष्कार ठरला. गावातील महिला, पुरुष, युवक व अबालवृद्धांची लक्षणीय उपस्थिती यावेळी पाहायला मिळाली.







