साक्षीदार | १९ नोव्हेबर २०२३ | राज्यातील अनेक जिल्ह्यात चोरीच्या घटना घडत असतांना आता चोरट्यांनी शेतकऱ्यांना देखील चुना लावत असल्याची घटना धुळे जिल्ह्यात घडली आहे. राज्यात कपाशीला दर नसल्याने अनेक शेतकरी संकटात सापडले आहे त्यामुळे शेतकरी दिवाळी आल्यावर देखील कपाशीची घरात साठवणूक करून ठेवली असतांना त्यावर आता चोरटे डल्ला मारू लागले आहे. चिंचखेडा या गावातून तब्बल ३२ क्विंटल कपाशी चोरीला गेल्याचे समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, म्हसदी- चिंचखेडे रस्त्यावर चिंचखेडे येथील शेतकरी केदार रामचंद्र पाटील यांची बागायती शेती आहे. पाटील यांचे शेतातच घरही आहे. शेतातील घरालगतच शेतातील माल व शेतीची अवजारे ठेवण्यासाठी शेड उभारली आहे. या पत्र्याच्या शेडमध्ये सुमारे ३२ क्विंटल कपाशी पोत्यामध्ये भरून ठेवली होती. सध्या कपाशीला अपेक्षित दर नसल्याने शेतकऱ्यांनी कपाशी संग्रही ठेवली आहे. परंतु शेळमध्ये ठेवलेला हा कापूस आता सुरक्षित नसल्याचे जाणवू लागले आहे.
लक्ष्मीपूजन अर्थात दिवाळीच्या मध्यरात्रीस चोरट्यांनी पोत्यात भरून ठेवलेली कपाशी लंपास केली. सकाळी श्री. पाटील शेतात गेल्यावर हा प्रकार लक्षात आला. श्री. पाटील कुटुंबीयांनी साक्री पोलिसांना घटनेची माहिती दिली. सध्या भुरट्या चोऱ्यांच्या घटना वाढल्या असून, पोलिसांनी बंदोबस्त करावा, अशी मागणी केली जात आहे.