Maharashtra Politics News | साक्षीदार न्यूज | विधानसभा आणि विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेतेपदाचा प्रश्न पुन्हा एकदा चांगलाच पेटला असून, शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी थेट राज्य सरकारलाच कठोर शब्दांत धारेवर धरले आहे. महाविकास आघाडी सरकारला सत्तेवर येऊन तब्बल एक वर्षाचा कालावधी उलटूनही दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेतेपद रिक्त असणे हे लोकशाहीसाठी धोकादायक असल्याचे सांगत ठाकरे यांनी थेट उपमुख्यमंत्रीपद रद्द करण्याची मागणी केली आहे.
संविधानात उपमुख्यमंत्री या पदाची कुठेही तरतूद नसल्याकडे लक्ष वेधत उद्धव ठाकरे म्हणाले की, जर सरकार कायद्याचे दाखले देणार असेल, तर हे असंवैधानिक पद तात्काळ रद्द करण्यात यावे. उपमुख्यमंत्र्यांकडे असलेली खाती त्यांना पूर्ण मंत्री म्हणून द्यावीत. “तिजोरीच्या चाव्या द्या, अगदी बाथरूमच्या चाव्याही द्या; पण उपमुख्यमंत्री हे बिरुद लावण्याची गरज नाही,” अशा खोचक शब्दांत त्यांनी सरकारवर टीका केली.
पुढे बोलताना ठाकरे म्हणाले की, दिल्लीतील सत्तेचा मजबूत पाठिंबा असूनही हे सरकार विरोधी पक्षनेतेपद जाहीर करण्यास का घाबरते, हा मोठा प्रश्न आहे. लोकशाही सशक्त ठेवण्यासाठी दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेतेपद नियुक्त करणे हे सरकारचे कायदेशीर आणि नैतिक कर्तव्य असल्याचेही त्यांनी ठामपणे सांगितले.
नगरपालिका निवडणुकांच्या मुद्द्यावर बोलताना ठाकरे यांनी गंभीर आरोप केले. पूर्वी बूथ कॅप्चरिंग व्हायचे, आता थेट संपूर्ण निवडणूकच कॅप्चर करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. मतदारयादीमध्ये मोठ्या प्रमाणावर गोंधळ असून, जसा भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नावर सर्वोच्च न्यायालय स्वतःहून हस्तक्षेप करते, तसाच लोकशाहीच्या या गंभीर विषयावरही हस्तक्षेप करून मतदारयादीतील त्रुटी दूर होईपर्यंत निवडणुका थांबवाव्यात, अशी मागणी त्यांनी केली.
विरोधी पक्षनेतेपद अद्याप रिक्त असल्याने उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्ला. उपमुख्यमंत्री पद रद्द करण्याची मागणी, नगरपालिका निवडणुकांवरही गंभीर आरोप.







