Social Work Maharashtra फरकांडे | साक्षीदार न्यूज | समाजप्रबोधन, व्यसनमुक्ती, युवक घडवणूक आणि वैचारिक जागृतीच्या कार्यात सातत्याने सक्रिय असलेल्या वैचारिक स्वराज्य या संस्थेच्या वतीने आयोजित सन्मान व गुणगौरव सोहळा – २०२६ हा कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात पार पडला. पंचक्रोशीतील विविध गावांमधून सामाजिक, शैक्षणिक व वैचारिक क्षेत्रातील मान्यवरांसह भाविक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या सोहळ्यात समाजासाठी निःस्वार्थपणे योगदान देणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा सन्मान करण्यात आला. व्यसनमुक्ती, संतपरंपरेतील विचारांचे प्रसारकार्य, युवकांचे चारित्र्य घडवणे आणि दिशाहीन जीवनाला सकारात्मक वळण देण्याच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत प.पू. नाथसंत श्री बालकनाथ महाराज यांना “समाजभूषण पुरस्कार – २०२६” प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार वैचारिक स्वराज्य संस्थापक दिनेश महाराज पाटील व ज्येष्ठ मान्यवरांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला.

बालकनाथ महाराज हे संतपरंपरेतील विचार, भक्ती व विवेकाचा संगम साधणारे प्रबोधन, तसेच व्यसनमुक्तीच्या चळवळीत केलेल्या कार्यासाठी सर्वत्र परिचित आहेत. त्यांच्या मार्गदर्शनामुळे अनेक युवकांचे जीवन सकारात्मक दिशेने वळले असून समाजात सद्विचारांची पेरणी होत असल्याचे मान्यवरांनी नमूद केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी वैचारिक स्वराज्यच्या वतीने आयोजित सामान्य ज्ञान परीक्षेत यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीस प्रोत्साहन देत त्यांच्या उज्ज्वल भविष्यास शुभेच्छा देण्यात आल्या.
यानंतर युवकांना प्रेरणा देणाऱ्या सामाजिक व वैचारिक कार्याची दखल घेत आदित्य पाटील यांना “युवा प्रेरणा पुरस्कार – २०२६”, तर सामाजिक बांधिलकीतून सातत्याने कार्य करणाऱ्या समाधान पाटील यांना “सामाजिक कार्यभूषण पुरस्कार – २०२६” प्रदान करून गौरविण्यात आले.
संस्थापक दिनेश महाराज पाटील यांनी आपल्या मनोगतातून वैचारिक स्वराज्यची भूमिका मांडत युवकांनी समाजकार्यात सक्रिय सहभाग घ्यावा, असे प्रेरणादायी विचार व्यक्त केले. पुरस्कार स्वीकारल्यानंतर आदित्य पाटील व समाधान पाटील यांनीही आपल्या अनुभवांतून समाजासाठी सकारात्मक कार्याचा संदेश दिला.
समारोपप्रसंगी समाजभूषण पुरस्कारप्राप्त प.पू. नाथसंत श्री बालकनाथ महाराज यांनी व्यसनमुक्त समाजनिर्मिती, संतविचारांचे महत्त्व आणि तरुणांनी विवेकशील जीवन जगण्याची गरज यावर प्रभावी मार्गदर्शन केले. त्यांच्या अमृतवाणीने उपस्थित श्रोते भारावून गेले.
कार्यक्रमाच्या शेवटी वैचारिक स्वराज्य संस्थेचे मार्गदर्शक व शिवव्याख्याते लक्ष्मणराव पाटील यांनी संस्थेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देत उपस्थितांचे आभार मानले. कासोदा, धरणगाव, कोळपिंप्री, कन्हेरे, तळई, कोठली, भडगाव तसेच पंचक्रोशीतील गावांमधील नाथभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र ठाकरे सर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वैचारिक स्वराज्य संस्थापक दिनेश महाराज पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.







