साक्षीदार | ९ ऑक्टोबर २०२३ | राज्यातील अनेक जिल्ह्यात गुन्हेगारी घटना घडत असतांना एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तीन अज्ञात व्यक्तींनी समाजसेवक, लेखक हेरंब कुलकर्णी यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याची माहिती मिळाली आहे. यासंबधीची तक्रार हेरंब कुलकर्णी यांनी अहमदनगर पोलिस ठाण्यात नोंदवली आहे. यावरून पोलिस पुढील तपास करत आहेत.
हेरंब कुलकर्णी यांनी अहमदनगर पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, ते आणि त्यांचे सहकारी गाडीवर जात असतानाच तीन अनोळखी व्यक्तींनी गाडीवरच त्यांचा पाठलाग केला. त्या व्यक्तींनी गाडीसमोर आडवी गाडी लावत हेरंब कुलकर्णी यांची गाडी थांबवली. त्यानंतर गाडीवरील दोन व्यक्ती आमच्याजवळ आले आणि त्यांनी काहीच न बोलता मारहाण करण्यास सुरूवात केली असल्याचा आरोप हेरंब कुलकर्णी यांनी केला आहे. मराठी साहित्य विश्वातील व्यक्तींवर हल्ले होण्याची ही पहिली वेळ नाही. या आधी देखील अनेकदा साहित्य क्षेत्रातील व्यक्तींवर हल्ले झाले आहेत. हेरंब कुलकर्णी यांच्यावर नेमका हल्ला कोणत्या कारणामुळे झाला, याचा अद्याप तपास सुरू आहे.







