Sanjay Gandhi Niradhar Yojana |यावल | मिलिंद जंजाळे | यावल तालुक्यातील दिव्यांग नागरिकांसाठी दिलासादायक निर्णय घेत प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत पात्र दिव्यांग लाभार्थ्यांना दरमहा २५०० रुपयांचे आर्थिक अनुदान देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून याबाबत तहसीलदार कार्यालय, यावल यांच्या वतीने अधिकृत आवाहन करण्यात आले आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी यावल तालुक्यातील पात्र दिव्यांग नागरिकांनी आवश्यक कागदपत्रे जमा करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. यामध्ये दिव्यांग प्रमाणपत्र (UDID), आधार कार्ड आणि बँक पासबुकची झेरॉक्स प्रत संबंधित तलाठी कार्यालय किंवा तहसील कार्यालय, यावल येथे जमा करणे आवश्यक आहे. यासाठी २० मार्च २०२६ ही अंतिम मुदत निश्चित करण्यात आली आहे.
तहसील प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, लाभार्थ्यांनी आपले UDID प्रमाणपत्र आधार कार्डशी लिंक करून सेवा केंद्रामार्फत नोंदणी करणे आवश्यक आहे. कागदपत्रांची पडताळणी पूर्ण झाल्यानंतर पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात दरमहा २५०० रुपयांचे अनुदान थेट जमा केले जाणार आहे.
या निर्णयामुळे यावल तालुक्यातील अनेक आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरजू दिव्यांग नागरिकांना मोठा आधार मिळणार आहे. त्यामुळे पात्र लाभार्थ्यांनी दिलेल्या मुदतीपूर्वी आवश्यक कागदपत्रे जमा करून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन तहसीलदार कार्यालय, यावल यांच्या वतीने करण्यात आले आहे.








