Ramgiri Maharaj | मिलिंद जंजाळे | यावल “ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा…” या अभंगाच्या सुरांनी भारलेले वातावरण आणि भक्तीच्या रंगात न्हाऊन निघालेला परिसर—अशा भावमय वातावरणात मुक्ताई माता फिरता नारळी सप्ताह आणि ज्ञानेश्वरी चिंतन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
श्री. आदिशक्ती मुक्ताबाई संस्थान व सकल हिंदू समाज, यावल व रावेर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या सोहळ्यात भक्ती, संस्कार आणि अध्यात्म यांचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला. ज्ञानेश्वरी चिंतनातून उपस्थित भाविकांनी जीवनमूल्यांचा गाभा आत्मसात केला.

या सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरले ते प.पू. महंत रामगिरी महाराज यांचे प्रभावी कीर्तन. अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील सरला बेट गोवर्धनपीठाचे मठाधिपती असलेल्या रामगिरी महाराज यांच्या कीर्तनाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. त्यांच्या प्रभावी वाणीने आणि समाजप्रबोधनाच्या संदेशाने संपूर्ण परिसर भक्तिरसात रंगून गेला.
यावेळी प.पू. चैतन्य गिरिजी महाराज (पंढरपूर देगलूरकर संस्थान), प.पू. आचार्य जनार्दन हरिजी महाराज, ह.भ.प. रवींद्र महाराज हरणे, ह.भ.प. नरेंद्र काका नारखेडे यांसारख्या संतांची उपस्थिती लाभली. त्यांच्या आशीर्वादामुळे कार्यक्रमाची आध्यात्मिक उंची अधिकच वृद्धिंगत झाली.
कार्यक्रमात कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा संचालक राकेश दादा फेगडे, संचालक सागर दादा महाजन, यावल खरेदी विक्री संघांचे उपसभापती तथा शिरसाड येथील ग्रामपंचायत सदस्य तेजस धनंजय पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
तसेच श्री. धनंजय एकनाथराव पाटील (संचालक, वि.का. सोसायटी शिरसाड) यांना गुढीपाडव्याच्या पावन दिवशी मुक्ताई मातेची आरती करण्याचा मान मिळाला, ही बाब विशेष ठरली.
या सोहळ्यात यावल तालुक्यातील विविध पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ज्येष्ठ मंडळी मोठ्या संख्येने सहभागी झाली होती. संपूर्ण कार्यक्रमात भक्तीभाव, एकात्मता आणि संस्कारांचे दर्शन घडले.
मुक्ताई माता फिरता नारळी सप्ताह हा केवळ धार्मिक कार्यक्रम नसून समाजाला आध्यात्मिक ऊर्जा देणारा आणि संस्कारांची शिदोरी देणारा प्रेरणादायी उपक्रम ठरत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.








