Zilla Parishad Elections | साक्षीदार न्यूज | राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांबाबत राज्य निवडणूक आयोगाने महत्त्वाचे आदेश दिले आहेत. 50 टक्क्यांपेक्षा कमी आरक्षण असलेल्या जिल्ह्यांमध्ये निवडणुका वेळेत पार पाडाव्यात, असे स्पष्ट निर्देश आयोगाने दिले असून, यासंदर्भात 11 जानेवारी रोजी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना अधिकृत पत्र पाठवण्यात आले आहे.
या आदेशानंतर संबंधित जिल्ह्यांमध्ये लवकरच निवडणूक आचारसंहिता लागू होण्याची शक्यता असून, प्रशासनाकडून निवडणूक तयारीला वेग देण्यात आला आहे. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, निष्पक्ष आणि सुरक्षित वातावरणात पार पडावी, यासाठी आवश्यक ती सर्व तयारी करण्याचे निर्देश आयोगाने दिले आहेत.
आचारसंहितेच्या कालावधीत कोणत्याही लोकप्रतिनिधींना मतदारांवर प्रभाव टाकेल अशा घोषणा, नवीन योजना किंवा कार्यक्रम जाहीर करता येणार नाहीत, असे आयोगाने स्पष्ट केले आहे. मात्र, जिल्हा परिषद क्षेत्राबाहेरील नगरपालिका व महानगरपालिकांचे दैनंदिन प्रशासकीय कामकाज सुरू राहील, याबाबतही आयोगाने स्पष्टता दिली आहे.
आचारसंहितेच्या अंमलबजावणीदरम्यान कोणत्याही प्रकारची तांत्रिक किंवा धोरणात्मक अडचण उद्भवल्यास स्थानिक पातळीवर निर्णय न घेता थेट राज्य निवडणूक आयोगाकडून मार्गदर्शन घ्यावे, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
दरम्यान, निवडणूक काळात पैशांचा गैरवापर, अवैध मद्य वाहतूक आणि गैरप्रकार रोखण्यासाठी पोलीस, उत्पादन शुल्क विभाग तसेच रेल्वे प्रशासनाला विशेष सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करणे तसेच प्रलंबित वॉरंटची अंमलबजावणी करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
सर्व प्रशासकीय आणि सुरक्षा यंत्रणांनी परस्पर समन्वय साधत निवडणुका शांततापूर्ण व सुरक्षित वातावरणात पार पाडाव्यात, असा निर्धार राज्य निवडणूक आयोगाने व्यक्त केला आहे.







