Erandol Leopard News | एरंडोल | तालुक्यातील अंतुर्ली–तळई परिसरात अलीकडच्या काही दिवसांपासून बिबट्याचा वारंवार वावर आढळून येत असल्याने शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दिवसा लाईट उपलब्ध करून द्यावी आणि बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करावा, या मागण्यांसाठी शिवआर्मी ग्रुप व महाराणा प्रताप युवा मंच यांच्या वतीने संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, शेतात काम करताना तसेच रात्री पिकांना पाणी देण्यासाठी मोटार सुरू करताना बिबट्याचे दर्शन होत असल्याच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे गावातील महिला, लहान मुले आणि शेतकरी बांधवांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. बिबट्याच्या मुक्त वावरामुळे कोणतीही अप्रिय घटना घडू नये, यासाठी वनपरीक्षेत्र अधिकारी एरंडोल यांच्याकडे तातडीने कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, रात्रीच्या वेळी शेतात जाऊन मोटार सुरू करणे आणि पाणी देणे अत्यंत धोकादायक ठरत असल्याचे शेतकऱ्यांनी नमूद केले. त्यामुळे पिकांना वेळेवर पाणी देता येत नसून शेतीचे नुकसान होत आहे. शेती हाच मुख्य उदरनिर्वाहाचा आधार असल्याने परिस्थिती कायम राहिल्यास आर्थिक संकट ओढवण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.
यासंदर्भात शेतीसाठी दिवसा वीजपुरवठा उपलब्ध करून द्यावा, या मागणीचे निवेदन उपकार्यकारी अभियंता महावितरण एरंडोल यांना देण्यात आले.
या प्रसंगी शिवआर्मी ग्रुपचे अध्यक्ष यशवंत खुशाल पाटील, महाराणा प्रताप युवा मंचचे अध्यक्ष विजयसिंग भीमसिंग पाटील, सुवर्णसिंग धनशिंग पाटील यांच्यासह भानुदास भावलाल पाटील, महेंद्रसिंग धरमसिंग पाटील, प्रेमराज गरबड पाटील, सुभाष प्रताप पाटील, लालसिंग हारसिंग पाटील, दिपक छगन पाटील, विशाल रावसाहेब पाटील, आकाश शांताराम मिस्तरी, होमसींग पाडुरंग पाटील, लोटन विठ्ठल पाटील, तुकाराम वेडू भिल, वाल्मीक विक्रम पाटील, विनोद फकीरा नाईक, ओम बापू पाटील, जयवीर पाटील, धनसिंग मानसिंग पाटील, सुमेरसिंग मानसिंग पाटील, तुषार आबा बाविस्कर, प्रविण अशोक घोडेस्वार, लोटन भावसिंग पाटील, निलेश लोटन पाटील, ज्ञानेश्वर बाळू पाटील, छोटू मानसिंग पाटील, दिवानसिंग प्रताप पाटील आदी शेतकरी बांधव उपस्थित होते.







