Revenue Department किंनगाव | मिलिंद जंजाळे | महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या दि. १८ फेब्रुवारी २०२५ च्या शासन निर्णयानुसार राबविण्यात येणाऱ्या गतिमान प्रशासन व आपत्कालीन व्यवस्थेच्या बळकटीकरण योजनेअंतर्गत “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर” दिनांक १७ एप्रिल २०२६ रोजी किंनगाव येथे उत्साहात व नियोजनबद्ध पद्धतीने पार पडले.
या शिबिराचे उद्घाटन मा. तहसीलदार, यावल श्रीमती मोहनमाला नाझीरकर यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला विविध शासकीय विभागांचे अधिकारी, तालुका स्तरावरील कर्मचारी, स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. या उपक्रमातून प्रशासनाने ‘आपल्या दारी सेवा’ ही संकल्पना प्रभावीपणे राबवत नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिला. त्यामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण दिसून आले. शिबिरादरम्यान विविध सेवा व प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. यामध्ये जिवंत सातबारा, वारस नोंदी, उत्पन्न दाखले, शिधापत्रिका, जात प्रमाणपत्र आदींचा समावेश होता. तुकडा शेरा कमी करण्याच्या प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर प्रकरणे हाताळण्यात आली असून पात्र लाभार्थ्यांना दिलासा मिळाला. तसेच अधिवास (Domicile) व नॉन-क्रीमीलेअर प्रमाणपत्र, विशेष अर्थसाहाय योजना, लक्ष्मी मुक्ती सातबारा, आदिवासी खातेदार नोंदी, घरकुल योजना, आयुष्मान भारत कार्ड तसेच ट्रॅक्टर वाटपासारख्या विविध योजनांचा लाभही नागरिकांना देण्यात आला.
या शिबिरात महसूल, आरोग्य, सामाजिक न्याय, आदिवासी विकास आदी विभागांनी समन्वयाने काम करत प्रलंबित प्रकरणांचा तातडीने निपटारा करण्यावर भर दिला. विशेषतः तुकडा सातबारा प्रकरणांमध्ये झालेली मोठ्या प्रमाणातील कार्यवाही शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरली. शिबिराचा लाभ घेतलेल्या नागरिकांनी प्रशासनाच्या या उपक्रमाचे कौतुक करत अशा प्रकारचे शिबिर सातत्याने आयोजित करण्याची मागणी केली. एकूणच, “महाराजस्व समाधान शिबीर” हे प्रशासन आणि नागरिक यांच्यातील अंतर कमी करत शासनाच्या सेवा थेट गावपातळीवर पोहोचविण्याचा प्रभावी उपक्रम ठरल्याचे दिसून आले.









